Pune : ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ राज्यभर लागू; काय आहे योजना आणि कुणाला होणार फायदा?

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना’ राज्यात लागू करण्यात आली असून फक्त सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना म्हणजेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याव्यतिरीक्त प्रति सदस्य प्रति महा 5 किलो तांदूळ मोफत देण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली आहे.

पुणे जिल्हा ग्रामिण भागासाठी एप्रिल, मे व जून 2020 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार अन्नधान्याचे वाटप विहित दराने त्या-त्या महिन्यात करण्यात येणार आहे. त्यानुसार एप्रिल 2020 करीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांकरीता 23 किलो गहू व 12 किलो तांदुळ तसेच मे व जून 2020 या महिन्यांकरीता अंत्योदय योजनेतील शिधापत्रिकाधारकांकरीता 25 किलो गहू व 10 किलो तांदूळ प्रत्येक शिधापत्रिकेवर त्या-त्या महिन्यांमध्ये देण्यात येणार आहे.

प्राधान्य कुटुंब योजनेतील प्रती लाभार्थ्यांकरीता दरमहा 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ देण्यात येणार आहे. सदर गव्हाची किंमत 2 रुपये प्रतिकिलो तर तांदूळ 3 रुपये प्रतिकिलो आहे.

एप्रिल, मे व जून 2020 साठी अन्नधान्याच्या दिलेल्या नियमित नियतनानुसार विहित दराने अन्नधान्य वितरण झाल्यानंतरच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या मोफत तांदळाचे वाटप प्रति सदस्य प्रतिमहा 5 किलो या प्रमाणे प्राधान्य कुटुंब योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना एप्रिल, मे व जून 2020 महिन्यात करण्यात येणार आहे.

संबंधित लाभार्थ्यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रास्तभाव दुकानांमध्ये गर्दी न करता एक मीटर अंतर ठेवत धान्य घ्यावे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.