Pimpri : पूरबाधितांसाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेकडून अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तूंची मदत रवाना
एमपीसी न्यूज – सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पूर संकटात हजारो संसार उघड्यावर आले आहेत. त्यांना पूरसंकटातून बाहेर पाडण्यासाठी उभारी मिळावी. तसेच दैनंदिन जीवनात अडचणी येऊ नये, यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने तांदूळ, डाळ, चटणी, शुद्ध पाणी आणि अन्य जीवनावश्यक वस्तूंचे दोन ट्रक सांगली, कोल्हापूरच्या दिशेने आज (रविवारी) रवाना झाले.
यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, भारतीय कामगार सेना उपाध्यक्ष मनोहर भिसे, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, पिंपरी चिंचवड शहरप्रमुख योगेश बाबर, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, विभागप्रमुख विश्वनाथ टेमगिरे, सुखदेव नरळे, प्रदीप सपकाळ, समनव्यक परशुराम आल्हाट, दत्तात्रय भालेराव, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष भिवाजी वाटेकर, खंडू गवळी, परेश मोरे, प्रमोद शेलार, संतोष साळुंके, किशोर जैद, संतोष जाधव, प्रवीण जाधव, प्रमोद शिंदे, नीलेश मोरे, नागेश वनवटे, संदीप मधुरे, सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, सतीश कांठाले, अशोक साळुंके, गोरक्षनाथ दुबाले, ज्ञानोबा मुजुमले, बबन काळे, समर्थ नाइकवडे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा उज्वला गर्जे, प्रितेश शिंदे, पांडुरंग काळोखे, प्रदीप धामणकर, राजू तापकिर आदि उपस्थित होते.
कामगार नेते इरफान सय्यद व महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने पूरग्रस्तांना पाठविलेल्या जीवनावश्यक वस्तूमध्ये 25 हजार पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, संकटात सापडलेल्या बांधवाना त्वरित खिचडी बनविता यावी यासाठी चांगल्या प्रतीचा तांदूळ, तूर डाळ, चटणी इत्यादी वस्तूंचे एक किट बनविले आहे. हे किट पॅकिंग करून ट्रकमध्ये भरून पाठवण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात दोन-तीन ट्रक नवीन कपडे व जीवनावश्यक वस्तू पाठविण्यात येणार आहेत. शिवसेना, शिवसेनेच्या सर्व अंगिकृत संघटना, युवा सेना, महिला आघाडी, भारतीय कामगार सेना, महाराष्ट्र मजदूर संघटना यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी ‘कर्तव्य केंद्र’ सुरु करण्यात आले आहे. शहरातील नागरीकांनी व कामगारांनी पूर बाधित बांधवांसाठी मदतीचा हात पुढे करून आपला खारीचा वाटा देऊ केला आहे. शुद्ध पाणी, अन्न धान्य, वैद्यकीय साहित्य जमा केले आहे. जमा झालेले सर्व साहित्य कोल्हापूर, सांगली, कराड या भागात पाठवण्यात येणार आहे.
इरफान सय्यद म्हणाले, कोल्हापूर व सांगली येथील महापुराने कधी न भरुन येणारी हानी झाली आहे. अनेकांचे जीव गेले आहेत. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संसार उघड्यावर आले आहेत. पशुधनाचे देखील नुकसान झाले आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मदत करणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी माणसुकीच्या भावनेतून पिंपरी-चिंचवड शहरातील कष्टक-यांनी आपल्या परिने मदत करावी. कपडे, जेवण, धान्य, यासह संसारोपयोगी साहित्याची मदत करावी. तसेच मुस्लिम बांधवांनी बकरी ईदचा खर्च टाळून पूरग्रस्तांना मदत करावी.