Pimpri : पवना धरणातून 3600 क्यूसेक या वेगाने पाण्याचा विसर्ग 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकर आणि मावळ परिसरातील नागरिकांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याचा येवा वाढत आहे.  त्यामुळे आज (शुक्रवार) सकाळपासून 2908 ऐवजी विसर्ग वाढवून 3600 क्यूसेक या वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पवना नदी वाहू लागली आहे. पाण्याचा वेग जास्त नसल्याने घाबरण्याचे कारण नाही. तरीही, नदी काठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पिंपरी-चिंचवडकरांसह मावळवासीयांची तहान भागविणारे पवना धरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 100 टक्के भरले आहे.  त्यामुळे शहरवासीयांसह मावळ परिसरातील नागरिकांचा वर्षभराचा  पाण्याचा प्रश्न संपला आहे. एक जूनपासून 2543 मिमी पाऊस धरण परिसरात झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेला 2462 मिमी पाऊस झाला होता.

गेल्या आठ दिवसांपासून धरण  परिसरात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे हायड्रो पॉवर आऊटलेटद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर वाढल्याने आज सकाळपासून 2908 ऐवजी विसर्ग वाढवून 3600 क्यूसेक या वेगाने  नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.

पावसाची परिस्थती पाहून पाणी कमी-जास्त केले जाणार आहे, अशी माहिती शाखा अभियंता ए.एम.गदवाल यांनी दिली. पाऊस सुरूच राहिला तर पवना नदीतील पाण्याची पातळी वाढू शकते. यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.