Pimpri: ‘लोगो की समस्याओं की बात उठानेपर आमदार जगताप को गुस्सा क्यो आता है ?’

श्रीरंग बारणे यांचा खडा सवाल 

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, रस्त्यांवरील अतिक्रमणे यावर गेल्या वर्षभरात आमदार जगताप एकदाही बोलले नाहीत. अतिक्रमण आणि ‘खाबूगिरी’वर  आम्ही केलेली टीका आमदार जगतापांना चांगलीच झोंबली. माझ्या प्रश्नांना उत्तरे द्यायची सोडून त्यांनी वैयक्तिक टीका केली. ‘लोगो की समस्याओंपर की बात उठानेपर आमदार जगताप को गुस्सा क्यो आता है ‘, असा सवाल शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी उपस्थित केला. तसेच महापालिका कोणाची जहागिरी नाही.तसेच थेरगावांविषयी कायमच आकस बाळगणा-यांना तेथील विकास दिसत नाही असेही ते म्हणाले.

शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी गुरुवारी (दि.23) आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर बैठक घेऊन शहरातील अतिक्रमण, कचरा, पाण्याच्या समस्या मांडून आपली नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हे प्रश्न सोडविण्यात प्रशासन आणि सत्ताधारी अपयशी ठरत असल्याची टीका केली होती.  त्याला भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले होते. थेरगावातील अतिक्रमणाला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच खासदारकीच्या साडेचार वर्षात पिंपरी-चिंचवडसाठी किती निधी आणला हा संशोधनाचा विषय आहे, असे म्हटले होते. त्याला खासदार बारणे यांनी आज (सोमवारी) उत्तर दिले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खासदार बारणे यांनी म्हटले आहे की,  ‘आम्ही सगळे भाऊ सारे मिळुन खाऊ’  असा कारभार सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत सुरु आहे. सत्तेसाठी पक्षाचे झेंडे बदलणा-या जगताप यांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे. स्वत: किती पक्ष बदलले हे कदाचीत त्यांना आठवतही नसेल. समाजवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, मनसेचा सहारा असा प्रवास करीत भाजपावाशी झालेल्यांनी जगतापांनी दुस-या विषयी बोलणे हा मोठ ‘जोक’ आहे.

मी सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळतो. त्यामुळे नागरिकांनी केलेल्या तक्रारी, जनमानसाच्या  समस्या लोकप्रतिनिधी म्हणून अधिका-यांपुढे मांडणे माझे कर्तव्य आहे. त्यातून मी महापालिका आयुक्त व अधिका-यांसमवेत बैठक घेऊन शहरातील समस्या मांडल्या होत्या. राष्ट्रवादीची सत्ता घालवून शहरवासियांनी भाजपला सत्ता राबवयाला दिली आहे. ती उबवायला नाही.  भाजपने  सत्तेचा बाजार चालवला असून भ्रष्टाचार आणि ‘खाबूगिरी’ यातच ते गुरफटले असल्याने शहरातील नागरिकांच्या समस्येचा विसर तुम्हाला पडला आहे. केवळ आकसापोटी टीका करण्यात तुम्ही धन्यता मानता या तुमच्या कार्यास आमच्या लाख लाख शुभेच्छा, असेही त्यांनी म्हटले आहे.

मी केंद्राच्या योजनासाठी काय पाठपुरावा केला हे भाजपच्या मंत्र्यांना विचारा तेच तुम्हाला सांगतील. विधानसभा सोडून महापालिकेच्या कारभारातच रमण्यात अधिक धन्यता तुम्ही मानत असल्याने तुम्हांला शहरावासियांच्या व्यथा काय कळणार ? निवडणुकांना मी घाबरत नाही. मी माझ्या कामाच्या जोरावर व लोकसंपर्काच्या बळावर येणा-या लोकसभेला उभा राहणार आहे. त्यामुळे निवडणुकीत खोटी आश्वासने व गाजर दाखवून निवडणुका मी लढवल्या नाहीत. माझ्या कर्तृत्वाच्या जोरावर मतदारांच्या आशीर्वादाने मी 2019  ला पुन्हा खासदार होणार आहे. त्यामुळे मला निवडणुकीची चिंता नाही. त्याची काळजी जगताप यांनी करू नये, असा सल्ला ही बारणे यांनी दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.