Pune : दीड महिन्यात बंद पाईप लाइनचे काम पूर्ण करून कालवा दुरुस्ती करणार- गिरीश महाजन
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली कालवा फुटीची पाहणी
एमपीसी न्यूज- येत्या एक ते दीड महिन्यात बंद पाइप लाइनचे काम पूर्ण करून कळवा दुरुस्तीचे काम हाती घेणार असल्याचे आश्वासन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. गिरीश महाजन यांनी आज मुठा कालवा दुर्घटनास्थळी भेट देऊन कालवा दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली.
गिरीश महाजन म्हणाले, ” पुण्यातील कालवा फुटीला उंदीर घुशी खेकड्यांनी भरावाची माती पोखरली हे एक महत्वाचे कारण आहे तसेच कालव्यावर झालेली अतिक्रमणे हेही प्रमुख कारण आहे. हा कालव्यातून पुणे शहराला आणि शेतीला पाणी दिले जाते. हा कळवा चोवीस तास चालू राहत असल्याने याची दुरुस्ती करता येऊ शकत नाही” त्यासाठी एक ते दीड महिन्यात बंद पाईपलाईनचं काम पूर्ण करून त्यानंतर कालव्याची दुरुस्ती करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. कालवा फुटीची चौकशी 2 दिवसात केली जाईल आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आश्वासन महाजन यांनी दिले. भुयारी कालवा केला तर कालवा फुटण्याचा प्रश्न येणार नाही, अतिक्रमणे होणार नाहीत, पाणी गळती, चोरी थांबेल. त्यामुळे भुयारी कालवा करण्याचे शासनाच्या विचाराधीन असून त्या कामासाठी जवळपास 1200 कोटी रुपयांचा खर्च येऊ शकतो.
गरज नसताना 1200 क्युसेक पाणी सोडल, पालिका आणि पाटबांधरे विभागात समन्वय नाही, डागडुजी करता असलेले 2 कोटी रुपये वापरले नाहीत हे सर्व आरोप मात्र महाजन यांनी फेटाळले. महाजन यांच्या समवेत यावेळी आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक आदी उपस्थित होते.
महाजन यांनी यावेळी कालवा दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली तसेच या दुर्घटनेत बाधित झालेल्या नागरिकांची भेट घेऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नाची सरबत्ती करून मदतीची मागणी केली.