Pune : ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’मुळे जगाचा कायापालट होईल – अरविंद जोशी
मराठी विज्ञान परिषदेतर्फे व्याख्यान
एमपीसी न्यूज – एकविसाव्या शतकात कौशल्य, नाविन्यपूर्ण संशोधन याला महत्व असणार आहे. नवतंत्रज्ञानाचे अनेक अविष्कार आपण अनुभवत आहोत. आगामी काळात त्यात आणखी भर पडणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल
इंटेलिजन्समुळे (एआय) विज्ञान-तंत्रज्ञान आपल्या कल्पनेबरोबर चालले आहे. ‘एआय’ मुळे आपल्या जीवनात आमूलाग्र बदल होणार आहे. २०२५ पर्यंत ‘कृत्रिम बुध्दिमत्ता’ भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनेल,” असे मत संशोधक अरविंद जोशी यांनी केले.
मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने अरविंद जोशी यांचे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर व्याख्यान आयोजिले होते. नवी पेठेतील एस एम जोशी फाऊंडेशनच्या सभागृहात झालेल्या व्याख्यानावेळी मराठी विज्ञान परिषदचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, विनय र र, डॉ. नीलिमा राजुरकर, संजय मा. क., शशी भाटे, डॉ. सुजाता बरगाले, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे माजी
उपप्राचार्य विलास तोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अरविंद जोशी म्हणाले, “कृत्रिम बुध्दिमत्तेने ५० टक्के लोकांच्या हातचे काम जाईल, इतका कायापालट करण्याची क्षमता त्यात आहे. परंतू त्यामुळे घाबरुन न जाता वस्तुस्थिती समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे काही तोटे माणसाला होणार असले, तरी त्याचे अनेक फायदेही आहेत.
सुरक्षेच्या कारणास्तव तिचा चांगला उपयोग होऊ शकतो. जगात बऱ्याच देशांमध्ये तो केला जातो. थ्रीडी प्रिंटिंगमुळे भविष्यात आमूलाग्र बदल होईल. औद्योगिक क्षेत्रातही याचा वापर होत असून, अनेक वस्तू बनवल्या जात आहेत. दुबईमध्ये पोलीस विभागात फ़ेसरिकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी होतो. भविष्यात व्यापक स्वरूप घेऊ
शकणाऱ्या अल्झायमरसारख्या असाध्य मानसिक रोगावर कृत्रिम बुद्धिमत्ता उपकारक ठरू शकते.
राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, आगामी काळात येणाऱ्या नव नवीन तंत्रज्ञान येणार असून त्यामुळे आपण घाबरून जायचे कारण नाही. काहीसा क्लिष्ट विषय असूनही प्रेक्षकांनी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात दाखवलेली उत्सूकता प्रशंसनीय आहे. व्याख्यानामध्ये सतर्कतेचा सुर दिसून आला असला तरी कृत्रिम बुद्धिमत्ता विषयी कुतूहल वाढावे आणि त्याविषयी अधिक जाणून घेण्याकरिता
लोकांना प्रोत्साहीत करणे हाच त्यामागचा उद्देश अरविंद जोशी यांचा होता. सूत्रसंचालन नीता शहा यांनी केले. आभार संजय मा. क. यांनी मानले.