Pimpri : निगडीतील धिंग्रा मैदानावर आर्मी डे साजरा
इंडियन आर्मी डे आणि रोटरी क्लब ऑफ निगडी यांच्या वतीने आयोजन
एमपीसी न्यूज – १५ जानेवारी १९४९ रोजी जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्वीकारली होती. भारतातील ब्रिटीश कमांडर इन चिफ जनरल सर फ्रान्सिस बचर यांच्याकडून करियप्पा यांनी सूत्रे हाती घेतली होती. या ऐतिहासिक क्षणानिमित्त १५ जानेवारी हा सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो. निगडी प्राधिकरण येथील मदनलाल धिंग्रा मैदानांवर इंडियन आर्मी डे आणि रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने विविध खेळांचे प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी, विजय काळभोर, साधना काळभोर, कमलजित, रेणू मित्रा, प्रणिता अलुरकर, गुरुदिपसिंग, नितू दौलत, हरबिंदरसिंग दौलत, पॅरोकमांडो आणि शौर्यचषक विजेते मधुसुदन सुर्वे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, प्रताप भोसले, स्माईल फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष योगेश मालखरे आदी उपस्थित होते.
1992 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना सुभेदार गोरख ढमक यांनी प्रशिक्षण दिले. 20 जून 2005 मध्ये मणिपुर येथील चुरांदरपुर येथे आतंकवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी सशस्त्र अतिरेक्याबरोबर झालेल्या चकमकीत सुर्वे यांच्या डाव्या पायावर 7, उजव्या पायात 2, तर पोटात 2 अशा 11 गोळ्या लागल्या होत्या. त्यांच्या या धैर्याबद्दल राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते शौर्यपदक देऊन गौरविण्यात आले. या त्यांच्या विशेष धैर्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार केला. सैन्याच्या जवानांना यावेळी सलामी देण्यात आली.
शांतता प्रस्थापित करण्यामध्येही जवानांचा सहभाग
यावेळी मधुसुदन सुर्वे म्हणाले, बदलत्या काळाबरोबर सैन्यात येणाऱ्या नव्या पिढीची बौद्धिक आणि सामाजिक जडणघडण देखील बदलत आहे, अशा परिस्थितीत उद्याच्या युद्धासाठी या नव्या पिढीला प्रक्षिक्षण देऊन तयार करणे हे लष्करासमोरील प्रमुख आव्हान आहे.
त्यानंतर रोटरी क्लब निगडीचे अध्यक्ष सुभाष जयसिंघानी म्हणाले, भारतीय लष्कराला गौरवशाली इतिहास आहे. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर चीन आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युध्दात, तसेच कारगीलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या घुसखोरीच्या वेळी निर्भपणे भारतीय जवांनी शत्रुचा पराभव केला. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये देशामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्येही जवानांचा सहभाग आहे.