Pimpri : प्राधिकरणाने महिला सामाजिक संस्थांना भूखंडवाटपात 50 टक्के आरक्षण द्यावे – भारती चव्हाण
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने भूखंडवाटपात महिलांच्या सामाजिक संस्थांसाठी 50 टक्के आरक्षण ठेवावे, अशी मागणी मानिनी फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा भारती चव्हाण यांनी केली आहे.
प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांची भेट घेऊन भारती चव्हाण यांनी त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी सुषमा असलेकर, कल्याणी कोटुकर, वैशाली फडके, यशश्री आचार्य, अनुषा फडके, संगीता जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. या निवेदनाची प्रत महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनाही पाठविण्यात आली आहे.
प्राधिकरणातर्फे 84 सामाजिक संस्थांना भूखंड देण्यात येणार असून त्यात महिलांच्या संस्थांना 50 टक्के आरक्षण देण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे. शहरात महिलांची लोकसंख्या 60 टक्के असल्याचा दावा करीत महिलांच्या विविध संस्था सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कला अशा विविध क्षेत्रात भरीव काम करीत असल्याने प्राधिकरणाने त्यांना भूखंड देऊन महिला सक्षमीकरणास हातभार लावावा, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.