Pimpri News : नद्यांच्या प्रदूषणाबाबत पालिकेवर फौजदारी खटला

गजानन बाबर यांनी दिली होती तक्रार 

एमपीसी न्यूज – नद्यांच्या प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी पोहचण्यासाठी जबाबदार धरत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पुणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. माजी खासदार गजानन बाबर यांनी याबाबत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार दिली होती. 

गजानन बाबर यांनी लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, पिंपरी – चिंचवड पालिकेचे अपुरे नियोजन, हलगर्जीपणा तसेच अपुरे सिवरेज नेटवर्क यामुळे औद्योगिक व डोमेस्टिक सांडपाणी प्रक्रिया न करता थेट पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले जाते.  32 एमएलडी सांडपाणी प्रतिदिन प्रक्रिया न करताच थेट नद्यांमध्ये सोडले जाते यामुळे नद्यांच्या गुणवत्तेत फरक होतो. तसेच, त्याचा जलचर प्राण्यांवर, सभोवतालच्या परिसरावर व मानवी आरोग्यावर परिणाम होतो. केजुबाई बंधा-यातील मासे मृत्युमुखी पडल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निदर्शनात आणून दिले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका 520 एमएल डी पाण्याचा वापर प्रतिदिन करते परंतु संमती  पत्रामध्ये 450 एमएलडी  चा वापर करत असल्याचे दाखवले आहे.

केजुबाई बंधारा येथे पवनानदी मध्ये एकाच वर्षात तीन वेळा मासे मृत अवस्थेत आढळले.  पाण्याचा कलर चेंज होणे, पाण्याचा उग्रवास येणे, पाण्यामधील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होणे, पाण्यावर जलपर्णी तयार होणे, यामुळे सभोवतालच्या मानवी परिसरावर तसेच जलचर प्राण्यावर व पाण्याची गुणवत्ता यात बदल होतो. त्यामुळे रोगराई वाढून पर्यावरण व मानवी आरोग्य धोक्यात येते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे पाठपुरावा केला. मंडळाने वेळोवेळी नोटीस बजावली असून देखील पालिकेने दुर्लक्ष केले. अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची दखल घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर पुणे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे. पालिकेने संपूर्ण शहरात सिवेज नेटवर्क तयार केले असते तर ही वेळ आली नसती असे बाबर यांनी पत्रात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.