Delhi News : बैलगाडा शर्यत सुरु करा; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी, या मागणीचे निवेदन शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना दिले. यावेळी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील उपस्थित होते.

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम होत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागासाठी जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या या शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी केंद्रीय सरकारकडे सातत्यातने पाठपुरावा सुरु आहे. महाराष्ट्राची सुमारे 400 वर्षांची परंपरा, बैलगाडा शौकिन व मालक यांच्या भावना, देशी गोवंशाचे रक्षण व ग्रामीण पर्यटनाला चालना या हेतूने ‘बैल’ या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतील समावेश वगळावा. यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु होतील, अशी विनंती केंद्रीय मंत्र्यांना केली.

हे निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ देऊन बैलगाडा शर्यती पुन्हा सुरु करण्याबाबतचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल कोल्हे यांनी मंत्री गिरीराज सिंह यांचे आभार देखील मानले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.