Shaktiman Ghosh : विकास आराखड्यात अडीच टक्के जागा फेरीवाल्यांना द्या
एमपीसी न्यूज – संपूर्ण भारत देशामध्ये चार कोटींपेक्षा (Shaktiman Ghosh) अधिक फेरीवाले आहेत. फेरीवाले हे सर्वसामान्य लोकांना स्वस्तात सेवा उपलब्ध करून देतात. त्यांच्यासाठी आपल्या लढाईतून कायदा झालेला आहे. एकीकडे कायद्याची अंमलबजावणी सुरु असताना देशात व महाराष्ट्र राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या शहर विकास आराखड्यामध्ये कायद्यानुसार अडीच टक्के जागा या राखीव ठेवाव्यात असे निर्देश आहेत. त्याचे पालन पिंपरी-चिंचवड महापालिकेने करावे, अशी मागणी नॅशनल हॉकर फेडरेशनचे राष्ट्रीय महासचिव शक्तिमान घोष यांनी केली.
नॅशनल हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र हॉकर फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज (सोमवारी) निगडी येथे राष्ट्रीय फेरीवाला सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते. झारखंडहून आलेल्या राष्ट्रीय महिला महासचिव अनिता दास, समन्वयक मॅकेंझी डाबरे, महाराष्ट्राचे सचिव विनिता बाळेकुंद्री, जन आंदोलनाचे युवराज गतकळ, प्रदेश सचिव अनिल बारवकर, इरफान चौधरी, वृषाली पाटणे, माधुरी जलमुलवार, बिलाल तांबोळी, समाधान जावळे, बाळासाहेब सातपुते, सुशेन खरात, सय्यद अली, नंदा तेलगोटे, जरिता वाठोरे, सुखदेव कांबळे, संभाजी वाघमारे, वहिदा शेख, फरीद शेख आदीसह राज्य व शहरातील विक्रेते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांचा सन्मान, शासनाचे प्रमाणपत्र व कोरोना सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
Vidhan Parishad Election : अखेरच्या क्षणी सदाभाऊ खोत यांची माघार
घोष म्हणाले की, “फेरीवाला व्यवसायामध्ये (Shaktiman Ghosh) महिलांना दुय्यम स्थान दिले जाते. महिला आणि पुरुषांना याचा समान संधी समान जागा मिळणे गरजेचे आहे. फेरीवाल्यांना कार नको, बंगला नको ,घर नको फक्त त्यांना व्यवसायासाठी आरक्षित जागा द्या. देशभरामध्ये बिर्ला, अंबानी, आदानी, मफतलाल अशा श्रीमंतांचा जागावरती डोळा असून यासारख्या अनेक लोकांचे मॉल आहेत. याचा परिणाम होत असून रोजगार निर्माण करण्यावर मोठे आक्रमण आहे. काशिनाथ नखाते यांच्या पाठीशी कायम आम्ही उभी राहू. रस्त्यावरील लढाईसह कायदेशीर लढाईसाठी आपण सर्वांनी सज्ज राहावे”.
अनिता दास यांनी देशभरामध्ये विविध ठिकाणी झालेले सर्वेक्षण व मिळालेल्या प्रमाणपत्र तसेच निर्माण झालेल्या जागा बाबत माहिती दिली. महिलांना प्रोत्साहन दिले. मॅक डाबरे म्हणाले, की ”संघटनेतून शक्ती निर्माण होते आणि ही शक्ती फेरीवाला व कामगार यांच्या कल्याणासाठी वापरून योग्य नियोजन करावे. विनिता यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये विविध जिल्ह्यांमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये दौरे करून फेरीवाल्यांच्या प्रश्न जाणून भविष्यात लढाई करणार असल्याचे नमूद केले. प्रस्तावना अनिल बारवकर यांनी केली. सूत्रसंचालन संजय जाधव यांनी तर आभार किरण सडेकर यांनी मानले.