Ind Vs Eng Test Series : अक्षर – आश्विनपुढे इंग्लंडची शरणागती; एक डाव राखून भारत विजयी
एमपीसी न्यूज – आर अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीपुढे इंग्लंड संघाने अक्षरशः शरणागती पत्करली. भारताने पहिल्या डाव्यात 160 धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेला इंग्लंड संघ 135 धावांमध्येच गारद झाला. भारताने एक डाव राखून आणि 25 धावांनी इंग्लंडचा पराभव केला. भारताने 4 सामन्यांची ही कसोटी मालिका 3-1 ने जिंकली आहे.
तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल दोघांनी मिळून एकूण 100 धावांची भागीदारी केली. अक्षर पटेल 43 धावांवर रन आऊट झाला आणि त्याची अर्धशतकाची संधी हुकली.
दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरकडे मात्र शतकाची संधी होती. पण इशांत आणि सिराज लगेच बाद झाले. वॉशिंग्टन 96 धावांवर नाबाद राहिला. संघ 365 धावांवर ऑल आऊट झाला व भारतीय संघाला 160 धावांची आघाडी भेटली.
A resounding innings victory for India!
They beat England 3-1, and qualify for the final of the ICC World Test Championship!#INDvENG | #WTC21 pic.twitter.com/CNMmB2KiyQ
— ICC (@ICC) March 6, 2021
चहापानानंतर इंग्लंड संघ मैदानात उतरताच अश्विनने क्रॉलीची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर आलेला ब्रेनस्टॉ खातंही उघडू शकला नाही. अश्विनने रोहित शर्माच्या हाती त्याला झेलबाद केलं. यानंतर अक्षरने सिब्ले आणि बेन स्टोक्सची विकेट घेत इंग्लंडसमोर पराभवाचं संकट निर्माण केलं आहे.
इंग्लंडची धावसंख्या 20 षटकानंतर 40 धावांवर 4 बाद अशी झाली होती. यानंतर अश्विन आणि अक्षरने जो रुट आणि पोपची विकेट घेत इंग्लंडवर पराभवाचं संकट निर्माण केलं. डॅन लॉरेन्स वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभी करु शकला नाही.
लॉरेन्सने अर्धशतक आणि जो रुटने केलेल्या 30 धावा या सर्वाधिक धावसंख्या ठरल्या. या विजयासोबतच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी पात्र झाला आहे.