Akurdi News: इंदिरा गांधी सर्वात धाडसी पंतप्रधान : सचिन साठे

स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी व माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना कॉंग्रेसचे अभिवादन

एमपीसी न्यूज – आतापर्यंत देशाला लाभलेल्या पंतप्रधानांपैकी स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी या सर्वात धाडसी पंतप्रधान आहेत. बॅंकांचे सार्वजनिकीकरण, बांग्लादेशाची निर्मिती, हैद्राबादचा मुक्ती संग्राम, कुळ कायदा आणि गरिबी हटाव या  त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयांची फळे सध्या आपण चाखत आहोत.

पोलाद पुरुष देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशभरातील सहाशेंहून जास्त संस्थांने खालसा करुन सर्व सामान्य जनतेला सत्तेमध्ये सहभागी करुन घेतले. या महान व्यक्तींच्या दुरदृष्टीकोनामुळेच आज भारत देश शेती, उद्योग, अर्थ क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस सचिन साठे यांनी केले.

स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन साठे यांच्या हस्ते आणि शहर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष दिलीप पांढारकर यांच्या हस्ते इंदिरा गांधी व वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ नेते सुदाम ढोरे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, शहर कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष शहाबुद्दीन शेख, असंघटीत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे, सतिश भोसले, महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस मयुर जयस्वाल तसेच अशोक काळभोर, हर्षवर्धन पांढारकर, अनिरुध्द कांबळे, मकरध्वज यादव, राजेंद्र काळभोर, चंद्रशेखर जाधव, सुरेश लिंगायत, संदेश बोर्डे, गुंगा क्षिरसागर, संदेश नवले, बाबा बनसोडे, हिरामण खवळे, कुंदन कसबे, विशाल कसबे, कौस्तुभ नवले, गौरव चौधरी, अनिकेत अरकडे, दिपक जाधव, वशिम शेख, मोहन आडसुळ, आबा खराडे, विक्रांत सानप, वैभव किर्वे आदी उपस्थित होते.

यावेळी साठे म्हणाले की, पक्ष संघटनेमध्ये काम करुन पदं मिळतात, सत्ता असेल तर सत्तेतील पदं मिळतात परंतू सत्ता असो किंवा नसो पक्ष संघटनेतील ‘कार्यकर्ता’ हे पद कार्य करणा-या व्यक्तींच्या बरोबर नेहमी असते. ‘कार्यकर्त्यांचा’ आत्मसन्मान कॉंग्रेसमध्ये राखला जातो.

कॉंग्रेसने देशामध्ये पायाभूत सुविधा निर्माण केल्या. धरणे, रस्ते, महामार्ग, विद्युत व्यवस्था त्यामुळे निर्माण झालेली कारखानदारी, औद्योगिकीकरण आणि रोजगार निर्मिती हि कॉंग्रेसची फलश्रृती आहे. परंतू मागील सात वर्षांपुर्वी देशातील मतदारांनी फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेवला. त्यामुळे केंद्रातील कॉंग्रेसची सत्ता गेली. यामुळे खचून न जाता पिंपरी-चिंचवड शहरात कॉंग्रेसची सत्ता पुन्हा आणायची आहे.

मागील कालावधीत अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शहरातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कॉंग्रेसचा झेंडा फडकावत सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आंदोलने केली. राज्यात मागील सात वर्षात पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसने सर्वात जास्त आंदोलने केली. राष्ट्रीय कॉंग्रेस कमिटीने 1 नोव्हेंबरपासून देशभर सभासद नोंदणी सुरु केली आहे.

या नंतर टप्प्या टप्याने ब्लॉक अध्यक्ष, शहर जिल्हा अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांची तसेच सर्व कार्यकारीणीची निवड होणार आहे. या नोंदणी अभियानात सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग घ्यावा. पक्ष संघटना मजबूत करावी असेहि आवाहन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सरचिटणीस सचिन साठे यांनी केले. स्वागत हर्षवर्धन पांढारकर, सुत्रसंचालन सुरेश लिंगायत आणि आभार संदेश नवले यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.