Kalewadi : मावळातून डाकू नष्ट करायचेत – संजय राऊत

एमपीसी न्यूज –  बारामतीकरांचे नटबोल्ट विजय शिवतारे यांनी ढिल्ले केले आहेत. उरलेली सांगाडी कुठे पोहोचवयाचे ते आम्ही ठरवू, त्यात आम्ही तरबेज आहोत. आता मावळातून डाकू नष्ट करायचे आहेत, असा घणाघात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला. 

मावळ लोकसभा मतदारसंघाचे भाजप, शिवसेना, रिपाइं (ए), राष्ट्रीय समाज पार्टी, शिवसंग्राम, रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (गुरुवारी)जाहीर सभा झाली. या सभेत राऊत बोलत होते. काळेवाडी फाटा येथे झालेल्या सभेला पुण्याचे विभागीय नेते, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, राज्यमंत्री विजय शिवतारे,  शिवसेना उपनेत्या आमदार निलम गो-हे, खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार गौतम चाबुकस्वार, मनोहर भोईर, भीमराव तापकीर, संपर्कप्रमुख बाळाभाई कदम, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर,  शिवसेना राज्य संघटक गोविंद घोळवे, रघुनाथ कुचिक, सदाशिव खाडे, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका उर्मिला काळभोर उपस्थित होते.

राऊत म्हणाले, हिंदुत्वाचा तेजस्वी भगवा देशावर फडवकायचा आहे. देशाच्या संसदेत क्रांतिकारकांच्या भूमितील खासदार असला पाहिजे. संतांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची ही भूमी आहे. हा प्रदेश डाकूंचा झाला आहे. विधानसभा, महापालिका निवडणुकीत त्यांना घालविले आहे. आता हळूहळू उरले सुरले डाकू नष्ट करायचे आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. देशाला ताकद देण्याची हिम्मत भगव्यात आहे. मोदी पंतप्रधान झाले नाहीत तर देशात अंधकारमय होईल. त्यामुळे देशात शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी आणि दहशतवाद संपविण्यासाठी मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. त्यांचे हात बळकट करण्यासाठी श्रीरंग बारणे यांना निवडून देण्याचे आवाहन राऊत यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.