Moshi : भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनास सुरुवात

एमपीसी न्यूज – भारतातील सर्वात मोठे कृषि प्रदर्शन म्हणून नावलौकीत असलेल्या किसान 2018 या कृषि प्रदर्शनाला आज (बुधवार) पासून सुरुवात झाली. किसान कृषी प्रदर्शनाचे यंदा 28 वे वर्ष आहे. कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आलेल्या शेतकर्‍यांच्या गटातर्फे प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये बुलढाणामधील बादलवाडी येथील गजानन उबरहांडे, मारूती उबरहांडे, शुभम उबरहांडे, गणेश उबरहांडे, अनिल उबरहांडे, श्रीकृष्णा उबरहांडे, मंगेश उबरहांडे, प्रमोद उबरहांडे, मंगेश उबरहांडे, प्रमोद उबरहांडे, जालना तुपेवाडीतील राम कफरे, रघुनाथ मोरे, काशिनाथ मगर, सुखदेव खेडेकर, निभानी कफरे या शेतकर्‍यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. हे प्रदर्शन 12 ते 16 डिसेंबर दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाला पालकमंत्री गिरीश बापट यांनी भेट दिली.

किसान कृषी प्रदर्शनामध्ये 15 एकर प्रदर्शन क्षेत्रावर 600 पेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नव उद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान आणि  उत्पादने सादर करणार आहेत. प्रदर्शनाच्या पाच दिवसांमध्ये देशभरातून सुमारे 2 लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकर्‍यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकर्‍यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार्‍या 100 हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग आहे.

मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकर्‍यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकर्‍यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जल व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणार्‍या संधींची माहिती घेऊ शकतील. आंतरराष्ट्रीय दालनात चीन, तैवान व युरोप मधील कंपन्यांचा सहभाग आहे. मुख्यत्वे छोटी यंत्रे व अवजारे या ठिकाणी प्रदर्शित होत आहेत. भारतीय शेतकर्‍यांच्या गरजा व बाजारपेठ जाणून घेणे; भारतात विक्री प्रतिनिधी नेमणे, हा या कंपन्यांचा उद्देश आहे. हे दालन प्रदर्शनाचे पहिले 3 दिवस म्हणजे 12 ते 14 डिसेंबर खुले असेल.

प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क 100 रुपये आहे. पूर्व नावनोंदणीची सुविधा kisan.net या संकेतस्थळावर व kisan.net मोबाईल अ‍ॅपवर उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर केल्यास प्रदर्शन स्थळी येणार्‍या शेतकर्‍यांचा वेळ वाचेल. पूर्वनोंदणी करणार्‍यांना प्रवेश शुल्कात 50 रुपये सवलत मिळणार आहे. प्रदर्शनाच्या प्रवेशव्दारावर शेतकर्‍यांचा वेळ वाचवण्यासाठी, मोबाईल अ‍ॅपद्वारे आगाऊ नावनोंदणीची सोय केली आहे. आत्ता पर्यंत 5 हजार शेतक-यांनी किसान 2018 साठी पूर्व नावनोंदणी केली आहे. ही संख्या 50 हजार पर्यंत जाण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे.

kisan.net  मोबाईल अ‍ॅपवर सहभागी कंपन्या व त्यांच्या उत्पादनांची माहिती 1 महिना आधीपासूनच उपलब्ध  आहे. त्यामुळे शेतकरी व प्रदर्शक संस्थांमधील संवाद आधीपासूनच सुरु झाला आहे. मोशी येथील प्रदर्शन स्थळी जाण्यासाठी शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बस स्टॉप पासून बसची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी 020 – 30252020 / www.kisan.in इथे संपर्क करता येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.