Nashik : नाशिक-मुंबई महामार्गावर सशस्त्र दरोडा; डोळ्यात मिरचीची पूड टाकून 3 कोटी 67 लाख 55 हजारांचा ऐवज चोरुन नेला
एमपीसी न्यूज – मुंबई-नाशिक महामार्गावर आज (Nashik) पहाटेच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे.सोने आणि चांदीचे दागिने घेऊन जाणाऱ्या बजरंग कुरिअर सर्व्हिसच्या इको गाडीवर 4 ते 5 अज्ञात व्यक्तींनी सशस्त्र दरोडा टाकला.
आरोपींनी फिल्मी स्टाईलने माणिकखांबजवळ गाडीच्या पुढे आणि मागे गाडी आडवी लाऊन दरोडा टाकला. आरोपींनी गाडीतील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून 3 कोटी 67 लाख 55 हजारांचा ऐवज चोरुन नेला. आरोपी दरोडेखोरांनी लुटलेल्या ऐवजमध्ये साडेतीन किलो सोन आणि चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे.
या दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुंबईहून सोन्याची बिस्किटे, दागिने आणि चांदी असा 3 कोटी 67 लाख 55 हजारांचा ऐवज घेऊन एक ओमनी गाडी धुळ्याच्या दिशेला जात होती. बजरंग कुरिअर सर्व्हिसची ही गाडी होती. ही गाडी धुळ्याला डिलिव्हरीसाठी जात होती. या दरम्यान माणिकखांब जवळ चार ते पाच अज्ञात आरोपींनी गाडीला अडवलं.
आरोपींनी शस्त्रांचा दाख दाखवत गाडीतील ड्रायव्हर आणि त्याच्यासोबतच्या एका सहकाऱ्याला गाडीतून खेचलं. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली. यानंतर आरोपींनी गाडीतील सर्व कोट्यवधींचा ऐवज लुटून नेला. विशेष म्हणजे गेल्या महिन्याभरातील ही तिसरी घटना घाटी पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे.पोलीस या प्रकरणाचा सविस्तर (Nashik) तपास करत आहेत.