Pimple Nilkh: पालकमंत्र्यांनी पूर परिस्थितीचा घेतला धावता आढावा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पूरपरिस्थितीचा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (मंगळवारी) धावता आढावा घेतला. पिंपळेनिलख येथील शाळेत स्थलांतरित केलेल्या नागरिकांची भेट घेतली. वाकड, कस्पटेवस्ती, पिंपळेनिलख परिसराची पाहणी केली. पाऊस थांबल्यानंतर तातडीने मुळानदीच्या काठी सीमाभिंत बांधण्याचे निर्देश त्यांनी अधिका-यांना दिले आहेत.

कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे, महापौर राहुल जाधव, भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसेवक संदीप कस्पटे, तुषार कामठे, नगरसेविका आरती चौंधे, नगरसेवक विनायक गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

नगरसेवक कस्पटे यांनी पूर परिस्थितीची व मदतकार्याची माहिती दिली. तसेच मुळा नदीचे खोलीकरण करुन सीमाभिंत बांधण्याची मागणी केली. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी मुळानदीच्या बाजूला सीमा भिंत बांधणे आवश्यक आहे. पाऊस थांबल्यानंतर तातडीने सीमाभिंत बांधण्याचे काम हाती घेण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांना दिले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून हे काम करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली.

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धैमान घातल्याने नदीला महापूर आला होता. नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. रुग्णालयामध्ये देखील पाणी शिरले आहे. नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले होते. महापालिकेने दोन दिवसांत बोपखेल, दापोडी, पवारवस्ती, चिंचवड, पिंपळेगुरव या परिसरातील सात हजार लोकांचे महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरण केले आहे. आज पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे पाण्याची पातळी कमी आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.