Pimpri :  ‘त्या’ बोगस पदवीधारकांच्या पदव्या जप्त करा -डॉ. अभिषेक हरिदास

एमपीसी न्यूज – केंद्रीय मंत्री पोखरीयाल, माजी खासदार सुनील गायकवाड, उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत, शिवसेना आमदार राजन साळवी, माजी उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि अध्यामिक गुरु श्री श्री रवी शंकर यांच्या पदव्या बोगस असल्याचा दावा केअर ऑफ पब्लिक सेफ्टी संस्थेचे डॉ. अभिषेक हरिदास यांनी आज पिंपरी येथे पत्रकार परिषदेत केला.

आज पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केअर ऑफ पब्लिक सेफ्टी संस्थेचे डॉ. अभिषेक हरिदास म्हणाले, महाराष्ट्रात सुमारे एक हजार बोगस विद्यापीठांचा सुळसुळाट झाला असून हजारो तरुणांना बोगस पदव्या देण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

तसेच यापूर्वीच आपण केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरीयाल, लातूरचे माजी खासदार सुनील बळीराम गायकवाड, शिवसेनेचे आमदार राजन साळवी, सध्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत, माजी उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, ज्येष्ठ अध्यात्मिक गुरु श्री श्री रवि शंकर आणि भगवान श्री बाळासाई बाबा यांनी मिळविलेल्या पदव्या आणि त्यांना पदवी देणारे विद्यापीठ यूजीसीकडे नोंदणी झालेले नाही.

तसेच काही लोकांनी श्रीलंकेसारख्या परदेशातील विद्यापीठांच्या डॉक्टरेट पदव्या घेतल्या आहेत. परंतू, श्रीलंकेच्या सरकारने देखील अशी विद्यापीठे आमच्याकडे नोंद नसल्याचे सांगितले आहे.

यावेळी परिषदेत डॉ. अभिषेक हरिदास म्हणाले, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा अश्या बोगस संस्था आहेत, ज्यांची नोंद यूजीसीकडे नाही तरी सर्रास पदवी वाटपाचे काम सुरु आहे. संबंधित संस्थांवर पोलीसात तक्रार देखील दाखल केली आहे. तसेच बोगस पदवीधारकांवर सुद्धा योग्य कारवाई झाली पाहिजे. अशा बोगस शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमुळे नव्या पिढ्यांचे कधीही न भरून निघणारे नुकसान होत आहे. देशातील होतकरू तरुणांचे भवितव्य उध्वस्त करणाऱ्या अशा संस्थांवर आणि या संस्थांच्या पदवीधारकांवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी केअर ऑफ पब्लिक सेफ्टी संस्थेचे अध्यक्ष आदम बेग आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.