Pimpri: तुळजापूर मंदिर संस्थानने लॉकडाऊनच्या कालावधीत कर्मचार्यांना पूर्ण वेतन द्यावे; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल
कामगार नेते यशवंत भोसले यांची माहिती. Pimpri: Tuljapur Mandir Sansthan should pay full salary to its employees during lockdown period; Aurangabad bench verdict
एमपीसी न्यूज – श्री तुळजापूर मंदिर संस्थानने सुरक्षा रक्षक व सफाई कर्मचार्यांना लॉकडाऊनच्या कालावधीतील संपूर्ण वेतन द्यावे असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे, अशी माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष, कामगार नेते यशवंत भोसले यांनी दिली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत अनेक कारणांनी कामगारांचे वेतन रोखले होते. या निर्णयाचा देशभरातील कामगारांना लाभ होईल, असेही भोसले यांनी सांगितले.
श्री तुळजापूर मंदिर संस्थानने कामगारांचे वेतन रखडविल्याबाबत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने याचिका दाखल केली होती. त्यावर कामगारांना पूर्ण वेतन देण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिल्याचे सांगत भोसले म्हणाले की, श्री तुळजापूर मंदिर संस्थानमध्ये काम करत असलेले सुमारे 300 सुरक्षारक्षक व सफाई कंत्राटी कर्मचारी यांना तुटपुंजे वेतन दिले जाते. हे वेतन किमान वेतन कायद्यातील तरतुदीपेक्षाही कमी आहे. अशा स्थितीत येथील कर्मचारी मोठ्या मुश्किलीने संसार ओढत असताना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या मार्च व एप्रिल 2020 च्या काळात मंदिर संस्थानने कर्मचार्यांच्या वेतनात कपात केली होती. यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कर्मचार्यांना सेवेत कायम करावे. संस्थानच्या कायम कर्मचार्यांप्रमाणे त्यांना वेतन मिळावे. यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीने यापूर्वीच औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या या याचिकेच्या सुनावणी दरम्यान लॉकडाउनच्या काळातील वेतन पूर्ण न दिल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून न्यायालयाने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे 8 आणि 12 मे रोजी सुनावणी घेतली. सुनावणीअंती 12 मे रोजी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कर्मचार्यांना मार्च, एप्रिल, मे 2020 या महिन्यांचा पगार कोणतीही कपात न करता द्यावा, असा निकाल दिला आहे. याबाबतचे निर्देश उस्मानबादच्या जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांना दिले आहेत. लॉकडाऊनच्या काळात ‘काम नाही तर पगार नाही’ हे तत्व उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत या कर्मचार्यांना लागू करता येणार नाही, असेही भोसले यांनी सांगितले.
न्यायालयाचे आदेशाचे त्वरित पालन व्हावे – यशवंतभाऊ भोसले
तहसीलदार तथा व्यवस्थापक श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांना पत्र देवून या कर्मचार्यांचे वेतन त्वरीत दिले जावे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे, अशी मागणी कामगारनेते यशवंत भोसले यांनी केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंड देताना देशात लॉकडा
ऊनची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तसेच महाराष्ट्र शासनाने अध्यादेश काढून लॉकडाऊनच्या का
लावधीत श्रमिक, मजुरांचे वेतन कपात केले जाऊ नये किंवा रोखले जावू नये, असे आदेश दिले आहेत. असे असतानाही अनेक आस्थापनांनी कामगारांना वेतन देण्यास टाळाटाळ केली आहे. या देशभरातील शोषित कामगारांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा हा निकाल खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असेही ते म्हणाले.