Pune : दुधाच्या 1 कोटी प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा थांबवणे सहज शक्य -रामदास कदम

एमपीसी न्यूज – राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतरही आपण रोजच्या वापरातील 30 टक्के प्लॅस्टिक वापर थांबवू शकलेलो नाही. सर्व दूध उत्पादकांच्या १ कोटी प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा दररोज तयार होत असतो. ग्राहकांकडून धुतलेल्या दूध पिशव्या परत घेऊन पुर्ननिर्मिती साखळीत जमा केल्याने आपण प्रतिदिन ३५ टन प्लॅस्टिक पिशव्यांचा कचरा कमी करू शकतो, असे मत राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केले.

‘अमनोरा पार्क टाऊन’तर्फे टाऊनशिपमधील तब्बल ५,५०० कुटुंबांकडून कोणत्याही प्रकारचे वापरलेले प्लॅस्टिक परत घेण्याच्या उपक्रमास आज कदम यांच्या उपस्थितीत सुरूवात करण्यात आली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सुधीर श्रीवास्तव, सदस्य सचिव ई. रवींद्रन, अमनोरा पार्कटाऊन व सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, रीसायकल संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य अभय देशपांडे, चितळे डेअरीचे भागीदार श्रीपाद चितळे, अतुल चितळे, गिरीश चितळे, रीसायकलचे चेतन बारेगर आदी यावेळी उपस्थित होते.

या उपक्रमात अमनोरामधील कुटुंबांकडून धुतलेल्या दूध पिशव्या, प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा खाद्यपदार्थांच्या रॅपरच्या स्वरूपात येणारे प्लॅस्टिक असे कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक ‘रीलूप’ या अपच्या मदतीने गोळा केले जाणार आहे. उपक्रमात गोळा केलेल्या प्लॅस्टिकच्या बदल्यात नागरिकांना प्रतिकिलो २० गुण म्हणजेच २० रुपये अपच्या माध्यमातून दिले जाणार आहेत. हे गुण नागरिक वेगवेगळ्या २०० ब्रँड्सवर खर्च करू शकणार आहेत. एरवी नागरिकांकडून कच-यात फेकले जाणारे सर्व प्लॅस्टिक गोळा करून पुर्ननिर्मिती साखळीत सोडले जावे असा या उपक्रमाचा हेतू आहे.

‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्लॅस्टिक कच-याच्या नायनाटाबद्दल घेतलेली भूमिका आनंददायी असून महाराष्ट्र कायमच या बाबतीत अग्रस्थानी राहील.’’, अशा भावना कदम यांनी व्यक्त केल्या.

श्रीवास्तव म्हणाले, प्लॅस्टिक कच-यात गेल्यास त्यातील पुर्नर्निमितीची संधी वाया जाते. तसेच कच-यातील प्लॅस्टिक नष्ट करण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया किचकट असते. त्यामुळे प्लॅस्टिकचा संचय व पुर्ननिर्मिती गरजेची आहे.

‘‘अमनोरामध्ये २०१० पासूनच प्लॅस्टिक गोळा करून पुर्ननिर्मितीस देण्यास सुरूवात केली असून अमनोरा टाऊनशिपला राज्यातील पहिली प्लॅस्टिकमुक्त टाऊनशिप करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू,’’ असे अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले.

अभय देशपांडे म्हणाले, ‘‘हल्ली सर्वच जण मोबाईल आणि अप्सचा वापर करतात. त्यामुळे त्याच्या साहाय्याने अधिकाधिक नागरिकांना प्लॅस्टिक जमा करून ते पुर्ननिर्मिती साखळीत देण्यासाठी प्रवृत्त करता येईल. हडपसरमध्ये ३०० ठिकाणी चितळे दूध ग्राहकांकडील धुतलेल्या दूध पिशव्या गोळा करण्यास सुरूवात झाली आहे.’’

श्रीपाद चितळे म्हणाले, ‘‘चितळे दूध ग्राहकांना धुतलेली दूध पिशवी परत करताना अर्ध्या लिटरच्या पिशवीमागे २५ पैसे व १ लिटरच्या पिशवीमागे ५० पैसे परत दिले जाणार आहेत.’’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.