Pune: थिंक ग्लोबल फाउंडेशनचा सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार मकरंद अनासपुरे यांना

एमपीसी न्यूज – थिंक ग्लोबल फौंडेशनचा तिसरा राज्यस्तरीय “स्व. सदाशिव अमरापूरकर गौरव पुरस्कार (२०१९)” सुप्रसिद्ध सिनेअभिनेते आणि सामाजिक कार्यकर्ते मकरंद अनासपुरे, राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांना जाहीर झाला आहे. तशी घोषणा फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत आज केली.

फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यात या पुरस्कारांचे वितरण केले जाते. अभिनय आणि सामाजिक कार्य विभागातून अनासपुरे यांना रु. ५१०००, मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या वर्षी पासून फाउंडेशनने प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन कर्तबगार अधिकाऱ्यांचा देखील गौरव करण्याचे ठरविले आहे. यावर्षी गायकवाड आणि सोळंकी या दोन सनदी अधिकाऱ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे.

आजवर या पुरस्काराने सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख, पार्श्वगायक सुरेश वाडकर यांना सन्मानीत करण्यात आले आहे. मराठवाड्यातील अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या अनासपुरे यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. कोणतीही पार्श्वभूमी नसताना आणि कुणाचाही वरदहस्त नसताना त्यांनी मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. नाम फौंडेशनच्या माध्यमातून अभिनेते नाना पाटेकर आणि अनासपुरे यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातील दुष्काळ आणि आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम केले. त्यांचे आधारवड म्हणून उभे राहिले. अनासपुरेंची ही सामाजिक संवेदनशीलता दखलपात्र आहे. त्यामुळेच त्यांची पुरस्कार्थी म्हणून निवड करण्यात आल्याचे फौंडेशनचे अध्यक्ष किरण काळे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दुसरे पुरस्कार्थी राज्याचे साखर तथा कृषी आयुक्त शेखर गायकवाड यांनी शासनाच्या वतीने घरपोच धान्य योजना सुरु केली. नाशिकमध्ये ती यशस्वीपणे राबविली. महाराष्ट्र शासनाने या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेत सबंध राज्यात या योजनेची अंमलबजावणी केली.

तिसरे पुरस्कार्थी विशाल सोळंकी अत्यंत कमी वयात भारतीय प्रशासकीय सेवेत निवडले गेलेले अधिकारी आहेत. मूळ आसाम केडरचे असणारे सोळंकी सध्या महाराष्ट्रात प्रती नियुक्तीवर आहेत. राज्याचे शिक्षण आयुक्त असणारे सोळंकी सध्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या सुमारे अडीच कोटीहून अधिक विद्यार्थ्यांच्या मध्ये शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी हिरीरीने काम करीत आहेत. लवकरच भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून मान्यवरांच्या हस्ते तीनही पुरस्कार्थींना सन्मानित करण्यात येणार असल्याचे काळे यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.