Road Accident News : तीन वर्षात रस्ते अपघातात साडे चार लाखाहून अधिक लोकांनी गमावला जीव
एमपीसी न्यूज – भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सरकारच्या वतीने तीन वर्षांत रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या लोकांची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या आकडेवारी नुसार 2017 ते 2019 या तीन वर्षांत साडे चार लाखाहून अधिक लोकांनी रस्ते अपघातात आपला जीव गमावला आहे.
विविध राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या पोलीस विभागांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, वर्ष 2017 ते 2019 या कालावधीत देशातील सर्व रस्त्यावरील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
2017 – 1 लाख 47 हजार 913 मृत्यू
2018 – 1 लाख 51 हजार 417 मृत्यू
2019 – 1 लाख 51 हजार 113 मृत्यू
तीन वर्षांत 4 लाख 50 हजार 443 नागरिकांनी रस्ते अपघातात जीव गमावला आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात, रस्ते वापरकर्त्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी, जिल्ह्याच्या खासदार (लोकसभा) यांच्या अध्यक्षतेखाली, संसद सदस्यांना ‘रस्ता सुरक्षा समिती’स्थापन करण्यासाठी अधिसूचित केले आहे.
शिक्षण, अभियांत्रिकी (रस्ते आणि वाहने दोन्हीही), अंमलबजावणी आणि आपत्कालीन व्यवस्था यावर आधारित रस्ता सुरक्षेच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी, मंत्रालयाने एक बहुआयामी धोरण आखले आहे. त्या अनुषंगाने मंत्रालयाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत.