Nigdi : खड्डे बुजवायला प्रशासन ‘बळी’ ची वाट पाहते का?
सामाजिक कार्यकर्ते दीपक कुलकर्णी यांचा संतप्त सवाल
एमपीसी न्यूज – निगडी, यमुनानगर येथील मेन रोडची खोदाई केल्यानंतर रस्ता व्यवस्थित बुजविला नाही. रस्त्यावरील राडारोडा हटविला नाही. रस्त्यावर आलेली माती, खड्डे यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सातत्याने अपघात होत आहेत. आज (गुरुवारी) देखील खोदलेल्या खड्ड्यात ट्रक अडकला आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत एखाद्याच्या बळी गेल्याशिवाय प्रशासन आणि पदाधिकारी लक्ष देणार नाहीत का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते दीपक कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
पाणीपुरवठ्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकणे, जलनि:सारणाची कामे, भूमिगत गटारे आणि विविध केबल डक्टसाठी पिंपरी-चिंचवड शहरात सर्वत्र खोदाई केली आहे. निगडी, यमुनानगर येथे देखील खोदाई करण्यात आली आहे. खोदाई केल्यानंतर रस्ते व्यवस्थित बुजविले नाहीत. राडारोडा हटविला नाही. रस्त्यावर आलेली माती देखील हटविली नाही. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहे. आज देखील खड्ड्यात ट्रक अडकला. त्यामुळे महापालिकेने तातडीने खड्डे बुजवावेत, असे कुलकर्णी म्हणाले.
या खड्ड्याचा रस्त्यांची झाडलोट करणा-या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना देखील मोठा त्रास होत आहे. रस्ते झाडणा-या, कचरा गोळा करणा-या, कच-याची वाहतूक करणा-या सफाई कामगारांना मास्क, हँडग्लोव्हज, गणवेश देणे ठेकेदारांना बंधनकारक करावे. स्वच्छता कर्मचा-यांचे आरोग्यही तेवढेच म्हत्वाचे आहे. जो ठेकेदार या कर्मचा-यांना सुविधा पुरविणार नाही. त्या ठेकेदारांचा ठेका महापालिकेने रद्द करावा, अशी मागणी कुलकर्णी यांनी केली आहे.