Bhosari : मागील पाच वर्षात भोसरी परिसरात वाहिली विकासगंगा -शिवाजीराव आढळराव-पाटील

आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नातून पाणीपुरवठा सक्षम

एमपीसी न्यूज – भोसरी विधानसभा मतदारसंघात मागील पाच वर्षात विकासकामांची रेलचेल झाली आहे. स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा विभागातील अनेक कामे मार्गी लागली आहेत. मागील अनेक वर्षांपासून रखडलेला पाणीपुरवठयाचा प्रश्न विविध पातळ्यांवर वेळोवेळी लावून धरला. त्याला यश आले असून भामा आसखेड, आन्द्रा धरणातून पाणी आणण्यात येणार आहे. यामुळे भोसरीसह समाविष्ट गावांची तहान भागणार आहे, असे मत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

माजी खासदार आढळराव पाटील म्हणाले, “वाढत्या शहरीकरणाच्या क्रमवारीत पिंपरी-चिंचवडचा देशात तिसरा क्रमांक लागतो. मागील अनेक वर्षांपासून पिंपरी-चिंचवडसाठी आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव रखडला होता.

पिंपरी-चिंचवड शहराची तहान ही आजच्या दिवशी फक्त पवना धरणावर अवलंबून आहे. प्रस्तावित योजनेनुसार, मावळ आणि खेड तालुक्यातील या दोन धरणांतून पिंपरी-चिंचवडसाठी पाणीसाठा आरक्षित करण्यात आला होता. मात्र, तत्कालीन राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे पुन:स्थापना खर्च भरण्यास टाळाटाळ करण्यात आली. परिणामी, पिंपरी- चिंचवडकरांना अनेक वर्षांपासून हक्काच्या पाण्यापासून वंचित रहावे लागले.

शहरातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी तसेच भविष्यातील पाणी कपात व पाणीटंचाईचे संकट डोळ्यांसमोर ठेऊन पवना, आंद्रा आणि भामा आसखेड प्रकल्पातून पाणी उपलब्ध करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित खात्यांच्या मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला.

भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश आले आहे. शहरातील पाणी समस्या सोडवण्यासाठी ही योजना महत्त्वाकांक्षी आहे, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.

आढळराव पाटील पुढे म्हणाले, “महापालिकेमार्फत शहराच्या चिखली, चर्‍होली, वडमुखवाडी, दिघी आणि मोशी परिसरात पाणीपुरवठा होण्यासाठी नियोजित भामा आसखेड प्रकल्प राबविण्याची प्रक्रिया सुरू आहे. आगामी काही काळात हा प्रकल्प कार्यान्वयीत होणार आहे. या प्रकल्पामुळे भोसरी मतदार संघातील समाविष्ट गावांतील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. तसेच, या प्रकल्पाची मर्यादा वाढण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडे महापालिका प्रशासनाने पाणी आरक्षणाबाबत पैसे भरले आहेत. त्यामुळे आगामी 15 वर्षांसाठी पाणी आरक्षण करुन मिळाले आहे.

पहिल्या टप्प्यात 100 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात येणार आहेत. दुसर्‍या टप्प्यात 200 एमएलडी क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात येणार आहे. हे नियोजन 2045 पर्यंतची लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन केले आहे.

तळवडे, चिखली, मोशी, चर्‍होली, डुडूळगाव, दिघीमधील पाणीप्रश्न या योजनेमुळे कायमचा निकालात निघणार आहे. ही योजना कार्यान्वित झाल्यास टँकरमूक्त भोसरीचा संकल्प पूर्ण होणार असल्याचेही पाटील म्हणाले.

व्हिडिओ : –

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.