Alandi : आळंदी नगरपरिषदेची ‘माझी वसुंधरा’ अभियानात उत्तम कामगिरी

81 व्या वरून 38 व्या क्रमांकावर झेप

एमपीसी न्यूज –  राज्य शासनाद्वारे एप्रिल 2022 ते  मार्च 2023 या कालावधीत पृथ्वी, वायू,जल,अग्नी , आकाश या पंच तत्वांवर आधारित माझी वसुंधरा  हे  शासनाचे  महत्वाकांक्षी अभियान राज्यभर अमृत शहरे, नगरपरिषदा,नगरपंचायती, ग्रामपंचायती स्तरावर राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटातील एकूण 117 नगरपरिषदां मध्ये आळंदी ( Alandi)  नगरपरिषदेने मागील वर्षीच्या 81 व्या क्रमांका वरून प्रगती करत 38 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

PCMC : माझी वसुंधरा अभियानामध्ये महापालिका राज्यात प्रथम; 10 कोटींचे मिळाले बक्षीस

राज्य शासनाद्वारे पर्यावरणाचा ढासळत चाललेला समतोल, पर्यावरणाची होत असणारी हानी रोखण्यासाठी माझी वसुंधरा अभियान सुरू करण्यात आले. या अभियानात आळंदी नगरपरिषदेमार्फत वसुंधरा लीग, सायकल रॅली, इ बाईक रॅली, शहरातील शाळा व महाविद्यालये यामध्ये पर्यावरणासंबंधी विविध स्पर्धांचे आयोजन,वसुंधरा दूतांच्या निवडी यांसारख्या कार्यक्रमांच्या माध्यमातून शालेय, कॉलेज च्या विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या  जनजागृती करण्यात आली.तसेच शहरातील नागरिकांमध्ये पाणीबचत,विजबचत ,अपारंपरिक ऊर्जा,कचरा विलगीकरण ,फटाकेबंदी व पर्यावरणपूरक उत्सव साजरे करण्यास प्रोत्साहन यासारख्या  विषयावर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली.

माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासाठी  आळंदी नगरपरिषदेने केलेल्या कामाची दखल घेत पर्यावरण दिनादिवशी जाहीर करण्यात आलेल्या निकालात 25 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटातील एकूण 117 नगरपरिषदां मध्ये आळंदी नगरपरिषदेने राज्यात 38 वा क्रमांक पटकावला असल्याची माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
सदर अभियान यशस्वी रित्या राबविण्यासाठी आळंदी  (Alandi) नगरपरिषदेचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आरती पाटील,शीतल जाधव,किरण आरडे, प्रज्ञा सोनावणे,अक्षय शिरगिरे, संजय गिरमे,साधना शिंदे,किशोर तरकासे,सचिन गायकवाड,राम खरात, पाटोळे मॅडम, रोहन जगदाळे व सर्वच नगरपरिषद कर्मचारी, नगरपरिषद शाळांचे सर्व शिक्षक वृंद पर्यावरण दूत, शहरातील सुजाण नागरिक यांनी मोलाचे योगदान दिले.
तत्कालीन मुख्याधिकारी  अंकुश जाधव यांनी या अभियाना अंतर्गत राबविलेले उपक्रम, उपाययोजना आणि त्यात पुढे सातत्य राखणारे नगरपरिषदेचे सर्व अधिकारी,कर्मचारी,शाळांचे शिक्षक वृंद,पत्रकार बंधू,सेवा भावी संस्था, जागरूक आळंदीकर या सर्वांचे हे सांघिक यश असून येत्या वर्षात जास्तीत जास्त नागरिक विशेषतः तरुण वर्गास अभियानात सहभागी करण्याचा प्रयत्न केला जाईल. असे मुख्याधिकारी कैलास केंद्रे म्हणाले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.