Ind vs SA: पावसाने आणला सामन्यात व्यत्यय
एमपीसी न्यूज : (विवेक दि. कुलकर्णी)भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघामधील पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी दमदार कामगीरी करून पहिला दिवस आपल्या नावे करणाऱ्या भारतीय संघाच्या आंनदावर आज दुसऱ्या दिवशी पावसाने मात्र विरजन घातले आहे.
सेंच्युरियन येथील मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने पहीले दोन दिवस पाऊस तुरळक ते मध्यम असेल असा अंदाज वर्तवला होताच,पण सुदैवाने पहिल्या दिवशी मात्र वरुणराजाने ढगाआड दडून भारतीय संघाला दिलासा दिला होता.
आज मात्र सकाळपासूनच त्याने बऱ्यापैकी हजेरी लावली होती, त्यामुळेच खेळ सकाळी सुरू होऊ शकला नाही. चाहत्यांना मात्र किमान उपहारानंतर तरी पाऊस थांबेल अशी अपेक्षा होती,मात्र पावसाने आज सुट्टी घ्यायचीच नाही असे बहुधा ठरवले असावे,त्यामुळेच उपहारानंतर पंचानी मैदानाची पाहणी करून आजचा खेळ होणार नाही असे जाहीर केल्याने भारतीय संघाच्या गोटात मात्र नक्कीच निराशा पसरली आहे.
आता उद्या तरी पावसाने उघडीप घ्यावी अशीच अपेक्षा असंख्य चाहते करत असणार.जसे की भारतीय संघाने पहिल्या दिवशी दमदार कामगिरी करून आपल्या पहिल्या डावाला मजबूत स्थैर्य प्राप्त करून दिले आहे,त्यात आणखी दीडशे ते दोनशे धावा जमा झाल्या तर या दक्षिण आफ्रिका संघाला तीन दिवसात दोनदा गुंडाळून भारतीय गोलंदाज विजय मिळवतील इतके भेदक नक्कीच आहेत, त्यामुळेच पावसाने आता जराही सामन्यात व्यत्यय आणू नये इतकीच सर्वांची अपेक्षा असणार आहे.
संक्षिप्त धावफलक
भारत 3 गडी बाद 272
लोकेश राहुल नाबाद 122
अजिंक्य रहाणे नाबाद 40
लुंगी इंगीडी 45/3 बळी