Kiwale : नरेंद्र मोदी हेच सक्षम पंतप्रधान – खासदार श्रीरंग बारणे

किवळे विकासनगर येथील बैठकीत खासदार बारणे यांना विजयी करण्याचा संकल्प

एमपीसी न्यूज – संरक्षण, विकास आणि जगाशी असलेले नाते यामध्ये सुधारणा घडविण्यासाठी पुन्हा एकदा महायुतीचे सरकार यायला हवे. नरेंद्र मोदी हेच भारत देशाचा उत्कर्ष करतील. ते सक्षम पंतप्रधान आहेत. असे मत शिवसेना-भाजप-रिपाई-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केले. किवळे विकासनगर येथे झालेल्या कार्यकर्ता बैठकीत खासदार बारणे यांनाच पुन्हा एकदा निवडून देण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला.

किवळे विकासनगर येथील दत्त मंदिरात बैठक पार पडली. या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, मोहन कदम, दत्ता तरस, गणेश चव्हाण, नवनाथ तरस, संतोष तरस, अजिंक्य खंडेलवाल, राजेंद्र तरस, हृषीकेश मांढरे, निलेश तरस, रोहित तरस, अविनाश गाडे, अलका पांडे, दिलीप राऊत, दिलीप परदेशी, दिलीप पाटील, विशाल हगवणे, सुधीर तरस, रोहिदास तरस, रामभाऊ तरस, गोपीनाथ तरस, साधना तरस, मेघा तरस, बाळासाहेब तरस, पल्लवी दांगट, नंदकुमार राठोड, आबा दांगट आदी उपस्थित होते.

गणेश चव्हाण म्हणाले, “लोकांशी जवळीक साधणारी व्यक्ती म्हणजे खासदार श्रीरंग बारणे आहेत. लोकशाहीमध्ये घराण्याला महत्व नाही. तर इथे कामाला महत्व आहे. केवळ एका मोठ्या नेत्यांचा नातू किंवा मुलगा आहे, म्हणून लोकांनी त्याला खांद्यावर घेऊ नये. कामाचा उरक, जबाबदारीची जाणीव आणि सर्वसामान्य नागरिकांविषयी तळमळ असणारे खासदार श्रीरंग बारणे यांनाच पुन्हा विजयी करावे”

मोहन कदम म्हणाले, “काम करणा-या माणसाला कसलीच भीती नसते. त्यामुळे खासदार श्रीरंग बरणे हेच पुन्हा एकदा निवडून येणार आहेत. लोकसभा निवडणुकीत मावळ मतदार संघातून महायुतीच्या उमेदवाराला विजयी करूनच आता कार्यकर्ते स्वस्थ बसणार आहेत.”

गजानन चिंचवडे म्हणाले, “देहू येथे जिल्हा परिषदेच्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये विरोधकांनी साम दाम दंड भेद नीतीचा वापर करून देखील महायुतीचा उमेदवार विजयी झाला. बारामतीकरांनी आजपर्यंत पिंपरी-चिंचवड शहरामध्ये फक्त राजकारण केले. स्थानिक नेत्यांमध्ये दुफळी निर्माण करून इतके वर्ष महापालिकेत सत्ता राबवली. 1991 मध्ये अजित पवार पहिल्यांदा खासदार झाल्यावर आजपर्यंत त्यांनी कधीही पिंपरी-चिंचवड मधील कार्यकर्त्यांना फोन केले नव्हते. परंतु आज त्यांना गरज लागली म्हणून गल्लोगल्लीतील कार्यकर्त्यांना त्यांचे फोन येत आहेत.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “खासदार म्हणून काम करण्याची शैली, संसदेतील उपस्थिती, संसदेच्या पटलावर उपस्थित केलेले प्रश्न यांसारख्या अनेक निकषांवर देशातील सर्वश्रेष्ठ दहा खासदारांमध्ये श्रीरंग बारणे यांचा समावेश आहे. संसदेने त्याबाबत सलग पाच वर्षे संसदरत्न पुरस्काराने गौरविले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला मावळ लोकसभेसाठी मागील कित्येक वर्षांपासून खासदार म्हणून जबाबदारी पेलणारा एकही उमेदवार सापडला नाही”

“पुढील पाच वर्षात मावळ मतदार संघात रेल्वे जाळे विस्तारणार आहे. पुणे-मुंबई लोकलसेवा सुरू होणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील घाटाचा भाग कमी करण्यासाठी एका नवा बोगदा तयार होणार आहे. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवाशांचा सुमारे एक तास वेळ वाचणार आहे. नव्याने होत असलेल्या पनवेल विमानतळावर यामुळे तासाभरात पोहोचता येणार आहे. पुणे आणि मुंबई या दोन शहरांचा संपर्क वाढण्यास या कामांमुळे अधिक भर पडणार आहे. त्यामुळे देशाला पुन्हा एकदा सुरक्षित हातात देण्याची जबाबदारी मतदारांवर आली आहे” असेही खासदार बारणे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.