Maharashtra News : राज्यात सुमारे 22 हजार कैद्यांनी घेतला ई-मुलाखत सुविधेचा लाभ
एमपीसी न्यूज – कारागृह विभागाच्यावतीने ‘ई-प्रिझन्स’ प्रणालीअंतर्गत भारतीय तसेच विदेशी बंदी यांना कुटुंबीयांशी संवाद साधण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘ई-मुलाखत’ सुविधेचा (Maharashtra News) सुमारे 21 हजार 963 पुरूष व महिला कैद्यांनी लाभ घेतला आहे.
राज्यात 1 जानेवारी ते 31 मार्च या कालावधीमध्ये तळोजा मध्यवर्ती कारागृहातील 3 हजार 478, ठाणे मध्यवर्ती कारागृह 3 हजार 438, नागपूर मध्यवर्ती कारागृह 3 हजार 425, मुंबई मध्यवर्ती कारागृह 1 हजार 797, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह 1 हजार 559, कल्याण जिल्हा कारागृह 1 हजार 442, येरवडा मध्यवर्ती कारागृह 1 हजार 228 तसेच राज्यातील इतर कारागृहातील पुरूष व महिला कैद्यांनी ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेतला आहे.
अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा अमिताभ गुप्ता यांच्या प्रयत्नामुळे सुरु करण्यात आलेल्या या सुविधेअंतर्गत राज्यातील कारागृहात (Maharashtra News) बंद्यासंबंधीचे दैनंदिन कामकाज व बंद्यांना पुरविल्या जाणाऱ्या विविध सुविधांचे व्यवस्थापन करण्यात येते. या सुविधेची माहिती देण्याकरीता राज्यातील सर्व कारागृहांच्या दर्शनी भागात तसेच नातेवाईकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत.
कुटुंबीय, नातेवाईक, वकील यांना कैद्यांसोबत मुलाखत घेण्याकरीता ‘ई-प्रिझन्स’ प्रणालीवर पूर्वनोंदणी करता येत असल्यामुळे नातेवाईकांना इच्छित दिवशी व वेळी बंद्यांची (Maharashtra News) मुलाखत घेता येते. अधिकाधिक बंद्यांच्या नातेवाईकांचा या सुविधेचा लाभ घेण्याकडे कल असून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी येण्याच्या खर्चात बचत होणार आहे. ई-मुलाखतीस बंद्यांचे नातेवाईकांनी चांगला प्रतिसाद मिळत आहे.
दहशतवादी कारवायामधील तसेच पाकिस्तानी बंदी यांना सुरक्षेच्या कारणास्तव या सुविधेचा लाभ नाकारण्यात आला आहे. राज्यातील कारागृहांमध्ये सुमारे 600 पेक्षा अधिक विदेशी बंदी असून या सुविधेमुळे विदेशी कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधता येत आहे.