Mumbai: पालघर हत्याकांड प्रकरणी आरोपींना कडक शिक्षेसाठी प्रयत्न करणार – मुख्यमंत्री
समाज माध्यमांमध्ये चुकीचे माहिती टाकून विनाकारण धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश
एमपीसी न्यूज – दरोडेखोर असल्याच्या संशयावरून पालघर येथे दोन साधू व त्यांचा मोटारचालक अशा तिघांची हत्या केल्याप्रकरणी 110 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तर हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला या पैकी कुणीही वेगळ्या धर्माचे नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणावरून समाजात आणि समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलीस व सायबर सेलला कठोर कारवाईचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
पालघर येथील या घटनेचा देशभरातून तीव्र निषेध होत आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करुन सांगितले आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पालघरची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेचं राजकारण करु नये. उच्चस्तरीय चौकशी सुरू असून आतापर्यंत 110 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील नऊजण अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. कुणीही या घटनेचे विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करू नये, यासाठी सरकार लक्ष ठेऊन आहे, या प्रकरणावरून समाजात आणि समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलीस व सायबर सेलला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.