New Delhi : 15 ऑक्टोबरपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद करण्याबाबत कुठलेही पत्र नाही; पर्यटन मंत्रालयाकडून स्पष्टीकरण
एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 15 ऑक्टोबर 2020 पर्यंत हॉटेल्स / रेस्टॉरंट्स बंद राहतील, असा दावा करणारे एक खोटे पत्र पर्यटन मंत्रालयाच्या नावाखाली समाज माध्यमांवर फिरत आहे. यामुळे संपूर्ण पर्यटन क्षेत्रात भिती निर्माण झाली आहे. दरम्यान, ही बाब पर्यटन मंत्रालयाच्या निदर्शनास आली असून ‘पर्यटन मंत्रालयाने असे कोणतेही पत्र दिलेले नाही’ आणि अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांवर लोकांनी विश्वास ठेवू नये, असे पर्यटन मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
पर्यटन मंत्रालयाने यापूर्वीच सोशल मीडियावर हे वृत्त फेटाळले आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. पीआयबी फॅक्ट चेक युनिटनेही काही दिवसांपूर्वी हे वृत्त फेटाळले होते.
मात्र, खोटे संदेश पुन्हा सोशल मीडियावर फिरत आहेत. पीआयबी फॅक्टचेकने काल, मंगळवारी (दि. 21) पुन्हा स्पष्टीकरण दिले आहे. ‘अशा संदेशांकडे दुर्लक्ष करावे आणि केवळ अधिकृत निवेदनावर विश्वास ठेवावा’ असे पीआयबीकडून सांगण्यात आले आहे.