Nigdi News : लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे हाल; शालेय फी माफीसाठी तोडगा काढा : शिवसेनेची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

एमपीसीन्यूज : सध्या कोरोना महामारीमुळे सर्वसामान्य व मध्यमवर्गीय जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाउनमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून छोटे -मोठे व्यवसाय देखील बंद आहेत. अशा परिस्थितीत खासगी शाळांकडून फी वसुलीसाठी तगादा सुरु आहे. सध्या गोरगरीब आणि मध्यमवर्गीय अनेक हालअपेष्टांना तोंड देत आहेत. त्यामुळे सद्यपरिस्थितीत शाळांच्या फी माफीबाबत तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात निगडी-यमुनानगरचे शिवसेना विभागप्रमुख सतीश मरळ यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, सध्या कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन यामुळे सर्वसामान्य जनता खचुन गेली आहे. अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत खासगी शाळा व्यवस्थापनाकडून फी वसुलीसाठी तगादा सुरू आहे.

रोजगार बंद, व्यवसाय ठप्प असताना फी कुठून भरायची, असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे फी माफीसाठी सरकाकडून काहीतरी तोडगा काढून सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी मरळ यांनी निवेदनात केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.