Nigdi : विकासकामांसाठी झाडांचे पुनर्रोपण किंवा वृक्षतोडीशिवाय पर्याय नसतो – आयुक्त शेखर सिंह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर (Nigdi) देशातील सर्वात पर्यावरणपुरक शहरांमधील एक शहर आहे. शहराचा हा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे आणि यासाठी उद्यान विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी आणि विकासकामांची अंमलबजावणी करण्यासाठी बऱ्याचवेळा झाडांचे पुर्नर्रोपण किंवा वृक्षतोड करण्याशिवाय पर्याय नसतो. शहरात विविध ठिकाणी हजारोंच्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात असून त्यात प्रामुख्याने देशी झाडांची लागवड केली जात आहे. नागरिकांनी या सर्व बाबी लक्षात घेऊन महापालिकेस सहकार्य करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आणि नागरिकांना रानजाई महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहनही केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने रानजाई महोत्सव’ व 27 वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन नियोजित महापौर निवास निगडी प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात 1 ते 3 मार्च 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी माजी उपमहापौर शैलजा मोरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, माजी नगरसदस्या शर्मिला बाबर, माजी नगरसेवक सुनिल कदम, वृक्ष प्राधिकरण समितीचे संभाजी बारणे, सहशहर अभियंता मनोज सेठिया, बाबासाहेब गलबले, उप आयुक्त रविकिरण घोडके, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उद्यान अधिक्षक राजेश वसावे तसेच महापालिका कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Maharashtra News : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहरातील वातावरण पर्यावरणपुरक ठेवण्यासाठी आणि नागरिकांना त्याचे महत्व कळावे यासाठी येत्या काळात तळवडे येथे महापालिकेच्या वतीने जैवविविधता उद्यानाची उभारणी करण्यात येणार आहे. साधारण 50 एकरमध्ये उभारण्यात येणाऱ्या या पार्कमुळे पिंपरी चिंचवड शहराला एक वेगळी ओळख निर्माण होणार असून नागरिकांना पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल असणार आहे.

उप आयुक्त रविकिरण घोडके म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचा बराचसा भाग हा हिरव्यागार वृक्षांनी वेढलेला आहे. या पर्यावरणपुरक वातावरणामुळे हे शहर सगळ्यात राहण्यायोग्य शहरांमधील एक शहर आहे. या (Nigdi) शहरातील नागरिकांना निरोगी, स्वच्छ वातावरणात जगता यावे यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षांची लागवड केली जात असून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच उपाययोजनांमधील जैवविविधता उद्यान हा महापालिकेचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांना स्वच्छ हवा तसेच पर्यावरणपुरक वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्यान विभागाचे उप आयुक्त रविकिरण घोडके यांनी तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.