Pune : डॉ. दाभोळकर प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाचे सनातन संस्थेकडून स्वागत

एमपीसी न्यूज –  डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निकालाचे सनातन संस्थेने संस्थेने  स्वागत केले आहे. याबाबत संस्थेने पुण्यात आज दि.10 मे (शुक्रवारी) रोजी पत्रकार परिषद घेऊन(Pune) एक पत्रक जाहीर केले.यावेळी  हिंदु जनजागृती समितीचे . सुनील घनवट, सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक आणि सनातन संस्थेचे पुणे येथील  चैतन्य तागडे आदी उपस्थित होते.

 

याबाबत एक पत्रक सनातन संस्थेने जाहीर केले असून त्यात म्हटले आहे की, “आज डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सन्मान करतो. या निकालानुसार सनातनचे साधक निर्दाेषच होते, हेच आज सिद्ध झाले आहे. सनातन संस्था हिंदू आतंकवादी असल्याचे सिद्ध करण्याचे ‘अर्बन नक्षलवाद्यां’चे प्रयत्न विफल झाले आहे”. आज पुणे सी.बी.आय. विशेष न्यायालयाने सनातन संस्थेचे साधक श्री. विक्रम भावे आणि हिंदु जनजागृती समितीशी संबंधित डॉ. विरेंद्रसिंह तावडे यांना निर्दाेष मुक्त केले, तसेच हिंदू विधीज्ञ परिषदेचे ॲड. संजीव पुनाळेकर यांनाही निर्दाेष मुक्त केले आणि हे करताना या गुन्ह्यात लावलेला दहशतवादी कारवायांशी संबंधित UAPA कायदाही रद्द ठरवला आहे. हा UAPA कायदा लावून सनातन संस्थेला भगवे आतंकवादी ठरवून बंदी घालण्याचा डाव होता, तो या निकालाने उद्ध्वस्त झाला आहे.

या प्रकरणात दोषी ठरवलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांचा प्रत्यक्ष जरी सनातन संस्थेशी संबंध तसेच ते सनातन संस्थेचे पदाधिकारी नसले तरी त्यांनाही या प्रकरणात गोवण्यात आले, अशी आम्हाला शक्यता वाटते. त्यामुळे या प्रकरणातील अधिवक्त्यांनी जशी इतरांना निर्दाेष मुक्त करण्यात भूमिका बजावली, तशीच उच्च न्यायालयात हे प्रकरण नेऊन त्यांनाही निर्दाेष मुक्त करण्यासाठी लढतील, असे त्यांनी आज घोषित केले आहे. मुंबई उच्च न्यायालयात सचिन अंदुरे आणि शरद कळसकर हे निर्दाेष मुक्त होतील, अशी आम्हाला खात्री वाटते.

या प्रकरणी आरोपपत्रात वेगवेगळ्या आणि सतत बदलणार्‍या भूमिका तपास यंत्रणांनी मांडल्या. इतकेच नव्हे, तर आरोपी शोधण्यासाठी ‘प्लांचेट’च्या माध्यमातून सनातन संस्थाच दोषी असल्याचे वदवून घेण्यात आले. त्यानंतर सनातन संस्थेचे विनय पवार आणि सारंग अकोलकर यांना अगोदर मारेकरी ठरवण्यात आले. त्यापूर्वी ज्यांच्याकडून पिस्तुल मिळाले, त्या मनीष नागोरी आणि विकास खंडेलवाल यांनाही क्लिन चिट देण्यात आली. त्यानंतर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी हत्या केल्याची भूमिका मांडण्यात आली. या प्रकरणातील साक्षीदारांची भूमिकाच संशयास्पद होती. त्यांनी अगोदर विनय पवार आणि अकोलकर यांनाही मारेकरी म्हणून ओळखले होते. न्यायालयात त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते येऊन भेटल्याचे तसेच ते त्यांच्यासोबत जेवत असल्याचेही न्यायालयात त्यांनी सांगितले होते. साक्षीदारांच्या या कृतीतून त्यांच्यावर अंनिसचा दबाव होता का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रकरणात अंनिसचे केवळ साक्षीदारांशी संबंध असल्याचेच सिद्ध झाले इतकेच नव्हे, तर डॉ. दाभोलकरांच्या परिवाराने तपास यंत्रणांवरही दबाव आणला. परिणामी सनातन संस्थेचा पूर्वग्रहदूषितपणे तपास करण्यात आला. गेल्या 11 वर्षांत सनातनच्या  1600 साधकांच्या चौकशा करण्यात आल्या. सनातनच्या आश्रमांवर धाडी घालण्यात आल्या. या प्रकरणात मास्टरमाईंड शोधण्याच्या नावाखाली खटला प्रलंबित ठेवण्यात आला. सीबीआयने आरोपपत्रात सनातन संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांची चौकशी करून त्यात कोणीही दोषी आढळले नाही, असे नमूद केले आहे. आज 11 वर्षांनंतर सनातन संस्थेला विलंबाने मिळालेला हा न्याय आहे, संस्थेचे प्रवक्ता चेतन राजहंस यांनी पत्रकातून असे मत व्यक्त केले(Pune) आहे .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.