Chinchwad : आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यात प्रत्येक शनिवारी ‘फिर्यादी मेळावा’
महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी 11 ते दुपारी दोन या कालावधीत तक्रार मेळावा होणार आहे. आहे. या मेळाव्यात नवीन तक्रारी ऐकून, समजून आणि त्यावर कारवाई केली जाणार आहे. तर दुपारी तीन ते सहा या कालावधीत फिर्यादी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, चौकशी सद्यस्थिती आणि इतर आवश्यक माहिती देण्यात येणार आहे.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी फिर्यादी मेळाव्याची संकल्पना सुरु केली आहे. याबाबत त्यांनी मागील आठवड्यात सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिका-यांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या शनिवारी पहिला फिर्यादी मेळावा घेण्यात येणार आहे. याबाबतचा अहवाल वरिष्ठांना सादर करावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी, फिर्यादी आणि समस्यांकडे पोलीस अधिकारी गांभीर्याने लक्ष घालणार आहेत.
नागरिकांमध्ये पोलिसांबाबत नकारात्मक भावना असते. पोलिसांकडे तक्रार द्यायला गेल्यास पोलीस तक्रारदारांवरच आरोपीप्रमाणे प्रश्नांची सरबत्ती करतात. यामुळे अनेक नागरिकांचा भ्रमनिरास होतो. तर एखादी तक्रार दाखल झाल्यानंतर त्यावर लवकर कारवाई केली जात नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे असते. यावर तोडगा काढण्यासाठी तक्रारदिन, फिर्यादी मेळावा या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे नागरिक मनमोकळेपणे आपल्या तक्रारी मांडू शकतील.