Pimpri : मालिकेचा कोणता भाग वगळायचा हा अधिकार सर्वस्वी वाहिनीचा – डॉ. अमोल कोल्हे

अर्जुन खोतकर यांना कोणतेही आश्वासन दिले नाही

एमपीसी न्यूज – ‘स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेचे चित्रीकरण करतानाच आवश्यक ती संपूर्ण खबरदारी घेतली आहे. चित्रीकरण अगोदरच पूर्ण झाले आहे. त्यामुळे चिंता करु नये’, असे अर्जुन खोतकर यांना मी सांगितले आहे. कोणता भाग दाखवायचा, कोणता भाग वगळायचा हा निर्णय निर्मार्त्यांचा नसतो. तर, सर्वस्वी निर्णय झी मराठी या वाहिनीचा असणार आहे. त्यामुळे त्याबाबतील कोणतेही चुकीचे वृत्त प्रसारित केले जाऊ नये, असे आवाहन मालिकेत संभाजी महाराजांचे पात्र साकारणारे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.

मागील अडीच वर्षांपासून स्वराज्यरक्षक संभाजी मालिका सुरु आहे. या मालिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता ही मालिका फेब्रुवारी अखेर संपणार आहे. मात्र, या मालिकेवरुन सातत्याने विविध वावड्या उठविल्या गेल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सांगण्यावरुन मालिका बंद केली जात असल्याचा वावड्या उठविल्या होत्या. आता काही भाग वगळणार असल्याच्या वावड्या सोशलमिडीयावर उडविल्या जात आहेत. त्याचा डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे. मालिकेचे नियमित भाग दाखविले जाणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास दाखविला जाणार आहे.

डॉ. कोल्हे म्हणाले, “मालिकेतील भाग वगळण्याविषयी मी कोणतेही आश्वासन दिले नाही. हे वृत्त धादांत खोटे आहे. अर्जुन खोतकर यांच्याशी माझा संवाद झाला. परंतु, गेली अडीच वर्ष जगदंबा क्रिएशन आणि झी मराठी नैतिक जबाबदारीने छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांसमोर शुद्ध हेतूने आणत आहे. त्यामुळे कोणतीही अडचण येईल असे वाटत नाही. मालिकेचे चित्रीकरण करतानाच आवश्यक ती संपूर्ण खबरदारी घेतली आहे. मालिकेचे चित्रीकरण अगोदरच पूर्ण झाले आहे. आवश्यक खबरदारी घेतली आहे” त्यामुळे चिंता करु नये असे खोतकर यांना मी सांगितले असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले.

कोणता भाग दाखवायचा, कोणता भाग वगळायचा हा निर्णय निर्मार्त्यांचा नसतो. तर, सर्वस्वी निर्णय झी मराठी या वाहिनीचा असणार आहे. त्यामुळे त्याबाबतील कोणतेही चुकीचे वृत्त प्रसारित केले जाऊ नये, असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.