Pimpri : पवना नदीच्या ‘बीओडी’त वाढ; नदीची गुणवत्ता धोकादायक पातळीवर
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या ( Pimpri ) बायोलॉजिकल ऑक्सीजन डिमांडची (बीओडी) मागणी वाढली आहे. ‘बीओडी’ 25 पर्यंत गेला असून नदीची गुणवत्ता धोकादायक पातळीवर गेली आहे.
पिंपरी-चिंचवडकरांना पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पवना नदीतून रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातून पाणी उचलते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने रावेत, चिंचवड, पिंपरी, कासारवाडी, सांगवी आणि दापोडीतील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेतले होते. त्यात ‘बीओडी’ची मागणी वाढल्याचे निदर्शनास आले आहे.
रावेत परिसराचा ‘बीओडी’ 3 ते 4, चिंचवडमध्ये 7 ते 8, पिंपरीत 15 ते 20, कासारवाडीत 20 ते 22 आणि सांगवी, दापोडीला 20 ते 25 दरम्यान ‘बीओडी’ राहत आहे. वाढलेल्या ‘बीओडी’मुळे नदीच्या प्रदूषणात मोठी वाढ झाल्याचे दिसते. त्यामुळे महापालिकेने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. नदीची गुणवत्ता खालावत चालली आहे. औद्योगिक, सांडपाणी प्रक्रिया करुन नदीत सोडावे, असे एमपीसीबीचे उपविभागीय अधिकारी मंचक जाधव यांनी महापालिकेला निर्देश दिले ( Pimpri ) आहेत.