Pune : किरकोळ कारणावरून झालेल्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून टोळक्याने केलेल्या मारहाणीत युवकाचा खून झाला. ही घटना विश्रांतवाडी येथील धानोरी परिसरात मंगळवारी (दि. 21) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

सागर महादेव भालेराव. मुंजाबावस्ती, धानोरी असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी चार संशयितांना विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

धानोरी येथील मुंजाबावस्ती गणपती मंदिर चौकात सागर याची किरकोळ वादातून भांडणे झाली. याच भांडणातून दुसर्‍या गटातील पाच ते सहा जणांच्या टोळक्याने लाकडी पटट्यासह सागर याला लाथाबुक्यांनी मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत सागर घरी आला. त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

घटनास्थळी तात्काळ विश्रांतवाडी पोलिसांनी धाव घेऊन तपासाच्या सूचना दिल्या. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.