Pune News: ‘मातंग समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर लढा उभारणार’

हे वर्ष अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, ही अभियानाची मुख्य मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

एमपीसी न्यूज – मातंग समाजाच्या मागण्यांसाठी राज्यभर लढा उभारणार असल्याची माहिती या समाजाच्या नेत्यांनी मंगळवारी दिली. राज्यातील ३० विविध मातंग समाज पक्ष, संघटना प्रमुख यांची बैठक मंगळवारी पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर “मातंग स्पिक अभियान” ची घोषणा माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केली.

राज्यामध्ये सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय अशा सर्वच क्षेत्रात मातंग समाज लोकसंख्येने जास्त असूनही दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे वाचा फोडण्यासाठी समाजातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन, राज्यभर लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मागण्या मान्य न झाल्यास कोरोना महामारीनंतर रस्त्यावर लाखोंच्या संख्येने उतरण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

यावेळी माजी आमदार राजीव आवळे, मच्छिंद्र सकटे, हनुमंत साठे, प्रा.मिलिंद आव्हाड उपस्थित होते.

हे वर्ष अण्णा भाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, ही अभियानाची मुख्य मागणी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बार्टीच्या धर्तीवर आर्टी सुरू करून समाजाचा विकास करावा, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य असावा, अण्णा भाऊ साठे महामंडळाचे कामकाज पुन्हा सुरू करावे, लहुजी वस्ताद साळवे स्मारक तात्काळ करावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.