Pune : जिल्हाधिकारी कार्यलयासमोर झालेल्या गैरवर्तनाशी आमचा संबंध नाही – मराठा क्रांती मोर्चा
एमपीसी न्यूज – मराठा क्रांती मूक मोर्चा आणि सकल मराठा समाजातर्फे 9 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दुपारी आम्ही आंदोलन संपल्याचे जाहीर केले होते. मात्र , त्यानंतर काहीजणांनी त्याठिकाणी गोंधळ घातला व गैरवर्तन केले त्या व्यक्तींशी आमचा काहीही संबंध नसून त्यांना आम्ही ओळखत देखील नाही असे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्पष्ट केले आहे.
मराठा क्रांती मूक मोर्चा व सकल मराठा समाजाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, तुषार काकडे, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब आमराळे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, काल गैरवर्तन केले त्या व्यक्तींशी आमचा काहीही संबंध नसून त्यांना आम्ही ओळखत देखील नाही तर पत्रकार आणि पोलिसांशी जे गैरवर्तन केले त्याबाबद्दल आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहोत, असं देखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
आम्ही चाकणच्या आंदोलनापासून सांगत आलो आहोत की काही बाहेरील शक्ती आंदोलनात घुसून आंदोलन बदनाम करण्याचे काम करत असल्याचा दावा देखील यावेळी समन्वयकांनी केला आहे.
दुसरीकडे वाळूंज एमआयडीसीमध्ये झालेली तोडफोड ही मराठा आंदोलकांनी केली नसून जे भांडवलदार धार्जिणे कायदे आहेत. त्यांच्या विरोधात परप्रांतीय कामगारांनी केली असून पगार थकल्याने हा हल्ला झाल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले आहे.
यापुढे मराठा समाजास आरक्षण मिळावे व अन्य मागण्यासाठी चक्री उपोषण करण्यात येणार आहे. चक्रीउपोषण आंदोलनाच्या दरम्यान आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी आचारसंहिता तयार केली जाणार आहे, या आचारसंहितेनुसार चक्री उपोषणासाहित पुढची सर्व आंदोलन अहिंसक व लोकशाही मार्गाने आयोजित केले जाणार आहे. अन्य कोणत्याही व्यक्तींनी अथवा नेत्यांनी वेगळे आंदोलन करू नये तसे केल्यास मराठा क्रांती मोर्चाचा आणि त्यांचा काही संबंध नसेल अस मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने स्पष्ट केले आहे.