काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी दहशतवादी विचारसरणी नष्ट करा – संजय भिडे

एमपीसी न्यूज – काश्मीर प्रश्न सोडविण्यासाठी त्याचे मूळ शोधले पाहिजे. काश्मीरमधील लोकांच्या स्वायत्तता, रोजगार, शासन या तीन मागण्या असून त्या पूर्ण होणे गरजेचे आहे. काश्मिरी लोक हे आपलेच बांधव आहेत, अशी भावना प्रत्येकाच्या मनात असायला हवी. दहशतवाद नष्ट करण्यासाठी त्या भागातील लोकांचा विश्वास आपण संपादन करायला हवा. सैन्यदल दहशतवाद्यांना संपवू शकते पण दहशतवादी विचारसरणी संपवू शकत नाही. ज्यावेळी ती विचारसरणी संपेल, त्यावेळी ख-या अर्थाने काश्मीर प्रश्न सुटेल, असे मत निवृत्त मेजर जनरल संजय भिडे यांनी केले.



विश्वलीला ट्रस्टतर्फे एरंडवण्यातील सेवासदन दिलासा कार्यशाळेच्या सभागृहात आयोजित भारतीय लष्कर, त्यांच्या कार्यपद्धती व काश्मीर समस्या या व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी नगरसेवक धीरज घाटे, दिक्षा कदम, सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, संस्थेचे विश्वस्त देवव्रत बापट आदी उपस्थित होते. कार्यक्रमात विश्वलीला संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवानांच्या कुटुंबियांसाठी काम करणा-या सावली संस्थेला उपस्थितांनी मदत दिली.

संजय भिडे म्हणाले की, काश्मीर हा भारताचाच एक भाग आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. काश्मिरची अस्मिता समजून घेण्यासाठी प्रथम काश्मीरचा इतिहास समजून घ्यायला हवा. भारतातील आंतरिक गोष्टीमध्ये पाकिस्तानची दखल थांबविली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

अमोद जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. सचिन बर्वे यांनी प्रास्ताविक केले. रंजना बर्वे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.