Pune : शाश्वत शेतीसाठी सेंद्रिय शेतीचा पर्याय आदर्शवत
डॉ. सदानंद मोरे यांचे मत; विश्वकर्मा पब्लिकेशनतर्फे 'सेंद्रिय शेतीची यशोगाथा'चे प्रकाशन
एमपीसी न्यूज – ”शेती व्यवसायाला मंदी नाही आणि कोणी बंदीही घालू शकत नाही. असे असले तरी मागील अनेक वर्षांपासून शेतीची आणि शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. आजपर्यंत अनेक शेतकरी चळवळी होऊन गेल्या तरी परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. अशावेळी शेतीमधील नवीन प्रयोगांचा विचार करणे आवश्यक आहे. पाणीटंचाई लक्षात घेऊन शेती व्यवसायाचे नियोजन व्हावे. त्यासाठी सेंद्रिय शेतीचा पर्याय शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे. जलकेंद्रित आणि सेंद्रिय शेतीच्या जोरावर शाश्वत शेतीचे उद्दिष्ट गाठता येईल,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित आणि डॉ. चित्रलेखा पुरंदरे लिखित ‘सेंद्रिय शेतीची यशोगाथा’ (एका एकराची अभिनव ‘ज्ञानेश्वरी’) या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. पत्रकार भवन येथे झालेल्या या कार्यक्रमावेळी माजी विभागीय आयुक्त सुधीरकुमार गोयल, नाबार्डचे माजी मुख्य प्रबंधक एम. व्ही. अशोक, जलतज्ज्ञ डॉ. दि. मा. मोरे, अभिनव फार्मर्सचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके, लेखिका डॉ. चित्रलेखा पुरंदरे, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संपादक मनोहर सोनवणे, सहसंपादक संदीप तापकीर आदी मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकातून ज्ञानेश्वर बोडके यांनी केलेल्या अभिनव उपक्रमाची यशोगाथा शब्दबद्ध करण्यात आली आहे.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, ”माणसाने स्वतःबरोबरच इतरांचाही विचार करावा. आपल्याकडून झालेले यशस्वी प्रयोग इतरांना सांगावेत. याच विचारातून ज्ञानेश्वर बोडके यांनी इतर शेतकऱ्यांना आधार दिला आहे. त्यांनी शेतीमध्ये केलेल्या प्रयोगांना मिळालेले यश इतरांसाठी मार्गदर्शक आहे. शेती हा उद्योग आयटी क्षेत्राइतकाच मोठा आहे. शासनाने याबाबतची चांगली धोरणे बनवून शेतकऱ्यांना बळकटी द्यावी.”
सुधीरकुमार गोयल म्हणाले, ”शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी जोडले जाणे खूप गरजेचे आहे. व्यवसाय वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी पर्यायांचा विचार करावा. घरपोच शेतीमाल पुरविण्यासह आठवडीबाजार, मॉल याकडे जावे. ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतीमध्ये क्रांती घडवली आहे. त्यांच्या कार्यावरील हे पुस्तक अनेकांसाठी मार्गदर्शक ठरेल. शासनाच्या लोकांनीही बांधावर जाऊन शेतकऱ्यांची, शेतीची माहिती घेतली पाहिजे.”
डॉ. दि. मा. मोरे म्हणाले, ”शेतमालाचे उत्पादन करणे, त्यावर प्रक्रिया करणे व विक्री अशा प्रकारे शेतकऱ्याने काम केले पाहिजे. आज शेती पिकविणारा शेतकरी नाही तर दलाल श्रीमंत झाला आहे. दलालाला दूर करून शेतमालाची थेट विक्री केली पाहिजे. शेतकाऱ्यांनी शेतीचे विज्ञान समजून घेतले पाहिजे शेती सोबत शेत मालाच्या उद्योगावर भर दिला जावा.”
ज्ञानेश्वर बोडके म्हणाले, ”कमी पाणी, कमी मनुष्यबळ आणि चांगल्या सुविधांचा अभाव असला, तरी एका एकरातही चांगली शेती पिकविता येते. सेंद्रिय पद्धतीने पूर्णपणे विषमुक्त अन्न तयार करून यशस्वी शेती व्यवसाय केली जाऊ शकते. शेतीमध्ये केलेले हे प्रयोग पुस्तकात मांडले आहेत. हे पुस्तक देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे. यामधून शेतऱ्यांना नवीन मार्ग आणि प्रेरणा मिळेल.”
डॉ. परशुरामन व एम. व्ही. अशोक यांनीही मनोगत व्यक्त केले. शेतीतील अभिनव प्रयोगांची यशोगाथा असलेले हे पुस्तक अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, यासाठी ई-बुक स्वरूपात व अन्य भाषांमध्ये आणणार असल्याचे विशाल सोनी यांनी प्रास्ताविकात सांगितले. डॉ. चित्रलेखा पुरंदरे यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका मंडळी. संदीप तापकीर यांनी सूत्रसंचालन केले. मनोहर सोनावणे यांनी आभार मानले.