Khadi and Village Industries Commission : आदिवासी आणि फासेपारधी यांच्या स्वयंरोजगाराला ‘केव्हीआयसी’कडून प्रोत्साहन

KVIC promotes self-employment of tribals and fishermen

पालघर जिल्ह्यात नीरा आणि पामगुळ निर्मिती प्रकल्प सुरु

एमपीसी न्यूज – आदिवासींना आणि पारंपारिक फासेपारधी यांच्या स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे मंगळवारी (दि. 16) नीरा आणि पामगुळ निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यामध्ये देशातील रोजगार निर्मितीची क्षमता अधिक आहे. नीराला सॉफ्ट ड्रिंक्सचा पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्याचा देखील यामागे उद्देश ठेवण्यात आला आहे.

केव्हीआयसीद्वारे 7 दिवसांचे प्रशिक्षण दिलेल्या 200 स्थानिक कारागीरांना नीरा काढण्यासाठी आणि पामगुळ तयार करण्यासाठी केव्हीआयसीने साधन किट्सचे वितरण केले.

15 हजार रुपये किंमतीच्या या साधन किटमध्ये फूड ग्रेड स्टेनलेस स्टील कढई, छिद्रित मोल्ड, कॅन्टीन बर्नर आणि नीरा काढण्यासाठी लागणारी इतर उपकरणे जसे चाकू, दोरी आणि कुऱ्हाड यांचा समावेश आहे.

या उपक्रमामुळे 400 स्थानिक पारंपारिक फासेपारधींना थेट रोजगार उपलब्ध होईल. महाराष्ट्रात 50 लाखाहून अधिक पामची झाडे आहेत.

सूर्योदयापूर्वी पाम झाडापासून काढलेली नीरा हे सर्वाधिक पोषक तत्व असलेले आरोग्यदायी पेय म्हणून भारतातील अनेक राज्यांमध्ये याचे सेवन केले जाते. तथापि संस्थागत बाजारपेठेचे तंत्र नसल्यामुळे नीराचे व्यावसायिक उत्पादन व मोठ्या प्रमाणात विपणन अद्याप सुरू झाले नाही.

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. व्यावसायिकदृष्ट्या याचा वापर होण्यासाठी राज्यातील काही बड्या खेळाडूंना नीराचे, सॉफ्ट ड्रिंक म्हणून सेवन करण्यासाठी गुंतवणुकीच्या व्यवहार्यतेचाही गडकरी अभ्यास करत आहेत.

देशभरात अंदाजे 10 कोटी पाम वृक्ष आहेत. आगामी काळात नीराचे योग्यरित्या विपणन केल्यास कँडीज, मिल्क चॉकलेट्स, पाम कोला, आईस्क्रीम आणि पारंपारिक मिठाई यासारख्या अनेक पदार्थांची निर्मिती केली जाऊ शकते.

सध्या देशात पामगुळ, नीराचा 500 कोटी रुपयांचा व्यापार होतो. नीराच्या व्यावसायिक उत्पादनातून उलाढाल अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे.

केव्हीआयसीने नीरा आणि पामगुळ (गूळ) यांच्या उत्पादनाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे. नीराला आंबायला ठेवायला प्रतिबंध होऊ नये, यासाठी नियंत्रित परिस्थितीत प्रमाणित संकलन, प्रक्रिया व पॅकिंग सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

शीतगृह साखळीद्वारे प्रक्रिया केलेली नीरा बी2सी पुरवठा साखळीपर्यंत पोचण्याचा हेतू आहे.

व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साधलेल्या संवादात केव्हीआयसीचे अध्यक्ष विनय सक्सेना म्हणाले, “नारळ पाण्याच्या धर्तीवर, आम्ही नीराला बाजारात उपलब्ध असलेल्या शीतपेयांचा पर्याय म्हणून प्रोत्साहन देण्याचे काम करीत आहोत.

नीरा सेंद्रिय आणि पोषक तत्वांनी समृद्ध असून सर्वोत्तम आरोग्यवर्धक पेय आहे. नीराचे उत्पादन आणि विपणन वृद्धिंगत करण्यासह आम्ही ते भारतातील ग्रामीण उद्योग म्हणून स्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहोत,’’

सक्सेना पुढे म्हणाले की, नीराचे उत्पादन विक्रीबरोबरच स्वयंरोजगार तयार करण्याच्या बाबतीतही जास्त आहे. “पाम उद्योग हा भारतातील रोजगार निर्मितीचा एक प्रमुख मार्ग असू शकतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वावलंबन आणि स्थानिकांसाठीच्या आवाहनासह हे संरेखित केले आहे.”

श्रीलंका, आफ्रिका, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड आणि म्यानमारसारख्या देशांमध्येही निराचे सेवन केले जाते. त्यामुळे नीराची निर्यात क्षमता अधिक आहे.

महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या राज्यात पाम शेती मुबलक प्रमाणात आहे. यामुळे भारत जागतिक स्तरावर नीरेचा उत्पादक देश बनू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.