Pune :पुण्याचे पाणी तोडल्याप्रकरणी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार
महापौर मुक्ता टिळक, पाणी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा दिला इशारा
एमपीसी न्यूज -पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्या खडकवासला धरणातील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन पंप बंद केल्यामुळे पुणेकर नागरिकांचे पाटबंधारे विभागाने पाणी तोडले आहे. या पार्श्वभूमीवर महापौर मुक्त टिळक या पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारणार असून पूर्वीप्रमाणे पाणी न मिळाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, पुणे शहराचे पाणी तोडल्याप्रकरणी उद्या सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाटबंधारे कार्यालयात जाऊन अधिकाऱ्याची भेट घेऊन जाब विचारणार आहे. तसेच वेळप्रसंगी पुणेकरांसाठी उपोषण करणार आहे. त्याचबरोबर या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार पुणे शहराला 892 एमएलडी पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र तरी देखील अधिकच पाणी घेत असल्याने खडकवासला धरणावरील 240 एमएलडी क्षमतेचे दोन पाण्याचे पंप पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिस बंदोबस्तामध्ये बंद केले आहेत. त्यामुळे पुणेकराना पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. तसेच यापूर्वी देखील दोन वेळा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुणे महापालिकेला कोणतीही कल्पना न देता पाणी तोडले होते. त्या घटनेवरून पुणे महापालिकेच्या सभागृहात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर आता पुन्हा पाणी तोडल्याने पुणे शहरात पाण्यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.