Chattisgarh News : नक्षलवाद्यांच्या हल्यात 22 सुरक्षा जवान शहीद, 15 नक्षल्यांनाही कंठस्नान

एमपीसी न्यूज – छत्तीसगढ राज्यातील विजापूरच्या जंगलात शनिवारी नक्षलावादी आणि सुरक्षा जवानांमध्ये भीषण चकमक उडाली होती. यावेळी नक्षल्यांनी केलेल्या घातपाती हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. तर 14 जवान बेपत्ता झाले होते. बेपत्ता जवानांच्या शोधासाठी रविवारी सकाळी मोहीम हाती घेण्यात आली. बेपत्ता असलेल्या 14 जवानांचे मृतदेह जंगलात सापडले असून, 22 जवान शहीद झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या चकमकीत जवानांनी 15 नक्षल्यांना कंठस्नान घातलं आहे.

सुरक्षा दलांचे संयुक्त पथक सुकमा आणि विजापूर सीमेवरील तारेम परिसरात शनिवारी नक्षलविरोधी कारवाई करीत असताना ही अचानक चकमक उडाली. या संयुक्त पथकामध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा पथकातील जवान, जिल्हा राखीव दलाचे आणि विशेष कृती दलाचे असे दोन हजारांहून अधिक कर्मचारी होते. यावेळी नक्षल्यांनी सुरक्षा जवानांवर अंदाधूंद गोळीबार केला.

प्रत्युत्तरात जवानांकडून गोळीबार करण्यात आला. ही धुमश्चक्रीत सुरक्षा दलातील पाच जवान शहीद झाले, तर अन्य बारा जण जखमी झाले होते. तर 14 जवान बेपत्ता झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर सुरक्षा दलाने सुकमा आणि विजापूर सीमा परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती.

या शोधमोहिमेदरम्यान बेपत्ता असलेल्या 14 जवानांचे मृतदेह जंगलात आढळून आले. त्यामुळे नक्षल्यांसोबत झालेल्या चकमकीत एकूण 22 जवान शहीद झाले आहेत. तर एक जवान अजून बेपत्ता असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या धुमश्चक्रीत तब्बल 31 जवान जखमी झाले आहेत. जवानांना तातडीने विजापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं असून, सात जवानांना रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या चकमकीत 15 नक्षलवादी मारले गेले असल्याचे वृत्त आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.