Chinchwad : पुण्यात दिसेल तिकडे मराठा वादळ; प्रचंड प्रतिसादामुळे पदयात्रा तब्बल नऊ तास लेट
एमपीसी न्यूज – मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू (Chinchwad)असलेली पदयात्रा अजूनही पुणे शहरातील शिवाजीनगर परिसरात आहे. पदयात्रा मार्गावर पुढे आणि मागे लांब पर्यंत मराठा बांधव दिसत आहेत. या प्रतिसादामुळे या पदयात्रेला सुमारे नऊ तास विलंब झाला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई शहरात होणाऱ्या उपोषणाला जरांगे पाटील व लाखो मराठा बांधव जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून 20 जानेवारी रोजी मुंबईकडे निघाले आहेत. ही पदयात्रा मंगळवारी (दि. 23) दुपारी पुणे जिल्ह्यात दाखल झाली.
बुधवारी (दि. 24) ही पदयात्रा पहाटे खराडी येथून निघाली.(Chinchwad)खराडी येथून पुढे नगर रोडने गुंजन चौक – पर्णकुटी चौक – तारकेश्वर चौक – सादलबाबा चौक – संगमवाडी – संचेती चौक – सिमला ऑफिस चौक – सुर्यमुखी दत्तमंदिर चौक – विद्यापीठ चौक – औंध रोडने सरळ राजीव गांधी पुल असा पुणे शहरातील पद्यात्रेचा मार्ग होता. बुधवारचा मुक्काम लोणावळा येथे होणार आहे.
पदयात्रेत लाखो मराठा बांधव सहभागी झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यातील मराठा बांधव पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातून पदयात्रेत सहभागी होणार आहेत. पदयात्रा बुधवारी सकाळी नऊ ते दहा वाजता शिवाजीनगर येथे पोहोचणे नियोजित होते. मात्र ठिकठिकाणी होणारे स्वागत आणि मराठा बांधवांची अलोट गर्दी यामुळे ही पदयात्रा धीम्या गतीने पुढे जात आहे.
पदयात्रा बुधवारी दुपारी 12 वाजता सांगवी फाटा येथे पोहोचणे अपेक्षित होते. मात्र आता पदयात्रा रात्री नऊ पर्यंत सांगवी फाटा येथे पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाच तास ही पदयात्रा शहरातील वेगवेगळ्या मार्गावरून भक्ती शक्ती मार्गे मुंबईच्या दिशेने जाणार होती. मात्र आता पदयात्रेला मध्यरात्र होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पिंपरी चिंचवड शहरातून पुढे जुन्या पुणे मुंबई महामार्गाने देहूरोड – तळेगाव – वडगाव – कामशेत मार्गे लोणावळा येथे ही पदयात्रा मुक्कामासाठी जाणार आहे. पदयात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे वाहतूक पोलिसांनी पदयात्रेच्या मार्गावरील वाहतूक वळवली आहे. वाहतूक कोंडीत कडकायला नको म्हणून अनेकांनी बुधवारी घरातून बाहेर पडणे टाळले आहे. तर अनेक कंपन्यांनी पदयात्रेच्या पार्श्वभूमीवर घरून काम करण्याची मुभा दिली आहे. जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी अनेक मराठा बांधव पुणे मुंबई महामार्गावर सकाळपासून उभे आहेत.