Dehuroad: भंडारा डोंगर ट्रस्ट व मराठवाडा जनविकास संघातर्फे भंडारा डोंगरावर वृक्षारोपण

Dehuroad: Bhandara Dongar Trust and Marathwada Janvikas Sangh plant trees on Bhandara Dongar यामध्ये वड, चिंच, जांभळ, पिंपळ, आवळा, कडूलिंब, तुती, वाकुळ, उंबर, रूई अशी झाडे लावण्यात आली आहेत. पुढील तीन वर्षे टँकरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून वृक्ष संगोपन ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे.

एमपीसी न्यूज- पिंपळेगुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व भंडारा डोंगर ट्रस्ट यांच्यावतीने राजमाता जिजामाता यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

यामध्ये वड, चिंच, जांभळ, पिंपळ, आवळा, कडूलिंब, तुती, वाकुळ, उंबर, रूई अशी झाडे लावण्यात आली आहेत. पुढील तीन वर्षे टँकरच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करून वृक्ष संगोपन ट्रस्टच्या वतीने करण्यात येणार आहे.

मराठवाडा जनविकास संघाच्यावतीने यंदा राज्याच्या विविध भागात संरक्षक जाळीसह दोन हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात जगद्गुरू तुकाराम महाराज साधनाभूमी भंडारा डोंगर येथे वृक्षारोपण करून झाली.

यावेळी भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद पाटील, ट्रस्टचे सचिव ह.भ.प. जोपाशेठ पवार, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ नाटक पाटील, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, जयसिंग निघोट, वामन भरगंडे, ह.भ.प. मामा ढमाले आदी उपस्थित होते.

बाळासाहेब काशीद पाटील म्हणाले, की मराठवाडा जनविकास संघाने हाती घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनीही ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ असे म्हटलेले आहे. त्यामुळे भंडारा डोंगर परिसरात करण्यात आलेले वृक्षारोपण स्तुत्य उपक्रम आहे.

वृक्ष भेदभाव करत नाहीत, त्याप्रमाणे सर्वांचे आचरण असले पाहिजे. प्रत्येकाने झाडे लावत पर्यावरणाचे रक्षण करावे. वृक्ष आपले सखेसोबती आहेत. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे.

ही गरज ओळखून रोपांची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

अरुण पवार यांनी सांगितले, की आपण प्रत्येकाने एक झाड लावले व जपले तर सर्वत्र वनराई झाल्याशिवाय राहणार नाही. पर्यायाने पर्यावरण सुदृढ राहण्यास मदत होईल.

पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने गेल्या आठ नऊ वर्षापासून प्रतिवर्षी किमान दोन हजार वृक्षांची लागवड केली जाते. एवढेच नाही, तर ही झाडे जगली पाहिजेत, म्हणून रोपट्याचे वृक्षात रुपांतर होण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात त्यांच्या संगोपनाचीही जबाबदारी घेतली जाते.

जास्तीत जास्त वृक्षाची जाळीसह लागवड केली जाते. तसेच वृक्षांना गरजेनुसार टॅकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येतो. ही रोपे स्वयंभू होईपर्यंत ट्रस्टमार्फत त्यांची निगा राखण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.