Pune : गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने ; विवेक बुद्धी जागृती अभियान

विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी - ' सावित्रीची लेकरं उपाशी, विद्यापीठ प्रशासन तुपाशी' विद्यार्थ्यांच्या अधिकाराची लढाई चालूच राहिल ' ; आंदोलक विद्यार्थ्यांची भूमिका

एमपीसी न्यूज – भोजनाच्या सुविधासंदर्भात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात न्याय्य मागणी मांडत असताना अजामीनपात्र गुन्हे दाखल झालेल्या विद्यार्थी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी १० ऑगस्ट रोजी दुपारी २ पासून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जोरदार घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

३५३ कलमाखाली गुन्हे दाखल झालेल्या सतीश गोरे, सतीश पवार, आकाश दौंडे, आकाश भोसले (मुक्त पत्रकार), कृणाल सपकाळे, मुन्ना आरडे, सोमनाथ लोहार यांचा त्यात समावेश होता. युवक क्रांती दलाचे कार्यवाह संदीप बर्वे, युवक क्रांती दलाचे संघटक जांबुवंत मनोहर, कमलाकर शेटे, पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, सुदर्शन चखाले, अभिजित मंगल, सागर सावंत (दलित पँथर), शुभम चव्हाण (सम्यक विद्यार्थी आंदोलन), सुभाष कारंडे( आम आदमी पार्टी), शर्मिला येवले, रुकसाना शेख, शीना आणी निवेदिता (लोकराज), वैभव कदम (जनता दल सेक्युलर), सतीश गोरे, सतीश पवार, मुन्ना आरडे, आकाश भोसले, सोमनाथ लोहार, सतिशकुमार पडोळकर, अशोक चाटे व इतर विद्यार्थी, संघटना, नागरिक उपस्थित होते.

जोरदार घोषणा देऊन यावेळी विद्यापीठाचे प्रवेशद्वार दणाणून सोडण्यात आले. ‘एक ताट एक वाटी, आमचा लढा जेवणासाठी’,’ सावित्रीची लेकरं उपाशी, विद्यापीठ प्रशासन तुपाशी’, ‘ हल्ला बोल हल्ला बोल, दडपशाहीपे हल्ला बोल, तानाशाहीपे हल्ला बोल”,”पांडे ,तुमचा विद्यार्थ्यांवर भरोसा नाय का ?”  अशा घोषणा देण्यात आल्या. ” क्रांतीज्योती सावित्रीबाई  क्रांतीसुर्य महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीं, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचाही जयजयकार करण्यात आला.

रिफेक्टरी नियमांसंदर्भात आवाज उठवताना पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या आंदोलक  विद्यार्थ्यांवर  १ एप्रिल २०१९ रोजी  गुन्हे दाखल करण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी अलीकडेच जाहीर सभा घेण्यात आली होती . त्यात अन्वर राजन यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता.

कुलगुरूंनी गुन्हे मागे न घेतल्यास 22 तारखेला 11 वाजता रिफेक्टरी समोर (अनिकेत कॅन्टीन जवळ ) आंदोलन करण्यात येणार आहे.विवेक बुद्धी जागृती अभियान करून ,या सत्याग्रहात सहभागी होऊन , राष्ट्राचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.