Governor Bhagat Singh Koshyari: वयाच्या 79 व्या वर्षी राज्यपाल कोश्यारींनी पायीच केला शिवनेरी सर
कोणी कसं यावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी श्रद्धा होती म्हणून मी पायी आलो. शिवनेरीवर येण्यापूर्वी अनेकांनी मला तिथे पाऊस आहे. चिखल आहे. शिडी चढून जावे लागेल असे म्हणून घाबरवले होते.
एमपीसी न्यूज- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी सर करुन छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ माँसाहेबांचं दर्शन घेतले. राज्यपालांनी वयाच्या 79 व्या वर्षी पायीच हा गड सर केला. आतापर्यंत राज्याचे कोणतेच मुख्यमंत्री किंवा राज्यपाल किल्ले शिवनेरीवर पायी आलेले नाहीत.
‘कोणी कसं यावे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. माझी श्रद्धा होती म्हणून मी पायी आलो. शिवनेरीवर येण्यापूर्वी अनेकांनी मला तिथे पाऊस आहे. चिखल आहे. शिडी चढून जावे लागेल असे म्हणून घाबरवले होते.
परंतु, शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन होणे हा माझ्या भाग्याचा क्षण आहे. शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्तीमत्व नव्हते तर ते अवतारी पुरुष होते. त्यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा मिळते. ते खरे पूजनीय आदर्श आहेत.
शिवजन्मस्थळी आल्यावर महाराजांच्या आयुष्यातील कर्तृत्व प्रवासाकडे ध्यान जाते. यापुढील काळात राम, कृष्ण, गुरु गोविंदसिंग, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यावेत जेणे करून जग आपल्या देशाकडे तिरक्या नजरेने पाहू शकणार नाही,’ असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले.
यावेळी त्यांनी संपूर्ण शिवनेरी गडाची पायी चालत पाहणी केली. गडावरील शिवाई देवतेची आरती करून त्यांनी दर्शन घेतले. विविध वास्तूंची माहिती घेत. गडावरील विविध झाडांची नावे विचारत, गप्पा मारत त्यांनी शिवनेरीचा फेरफटका मारला.
शिवकुंज इमारतीतील राजमाता जिजाऊ आणि बालशिवबांच्या प्रतिमेशी ते लीन होऊन नतमस्तक झाले. शिवजन्मस्थळी शिवाजी महाराजांच्या पाळण्याची पूजा करत तेथील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांनी टि्वट करुन राज्यपालांचे कौतुक केले. वयाच्या 79 व्या वर्षी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी सर केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच यापुढे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
राज्यपालांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी 'पायी' सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो. pic.twitter.com/76hkxSAlPp
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 16, 2020