India Corona Update: चाचण्यांची संख्या वाढल्यामुळे दिल्ली कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबईच्याही पुढे!

India Corona Update: Delhi ahead of Mumbai in number of corona infected people due to increase in number of tests! देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबईला मागे टाकत दिल्ली हे सर्वात प्रभावीत शहर बनले आहे. राजधानी दिल्लीत कोरोना बाधितांची संख्या 70,390 वर पोहचली आहे. तर मुंबईत ही संख्या 69,528 आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाबाधितांच्या संख्येत मुंबईला मागे टाकत दिल्ली हे देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित शहर ठरले आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 70,390 वर पोहचली आहे. तर मुंबईत ही संख्या 69,528 आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत 1,118 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर दिल्लीत याच काळात तब्बल 3,788 इतके रुग्ण वाढले आहेत. अर्थात या दिल्लीमध्ये कोरोनाच्या चाचण्यांमध्ये करण्यात आलेली लक्षणीय वाढ हे दिल्लीतील कोरोना रुग्णवाढीचे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात येत आहे.

दिल्लीमध्ये आत्तापर्यंत 4 लाख 20 हजार चाचण्या केलेल्या आहेत, तर मुंबईत 2 लाख 94 हजार चाचण्या झाल्या आहेत. मुंबईत चाचण्या केलेल्या रुग्णांपैकी पॉझिटिव्ह अहवाल येण्याचे प्रमाण 23.2 टक्के तर दिल्लीत हे प्रमाण 16.7 टक्के आहे. दिल्लीत कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 2365 आहे तर मुंबईत 3964 मृत्यू नोंदवले गेले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर दिल्ली सरकारने सर्व कंटेनमेंट झोनमध्ये घरोघरी जाऊन स्क्रीनिंग करण्याचा प्लॅन आखला आहे. 30 जूनपर्यंत हे स्क्रीनिंग पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यानंतर कंटनेमेंट झोन वगळता शहराच्या इतर भागांमध्येही 6 जुलैपर्यंत स्क्रीनिंग केले जाणार आहे.

देशात गेल्या 24 तासात कोरोनाबाधितांच्या संख्येत आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ झाली आहे. देशभरात कोरोनाबाधित 16 हजार 922 ने वाढले आहेत. तर मृतांचा आकडा 418 ने वाढला आहे. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4 लाख 73 हजार 105 वर पोहोचला आहे. त्यापैकी एकूण 2 लाख 71 हजार 697 रुग्ण बरे झाले आहेत.

देशातील 57.42 टक्के रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. सध्या देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 86 हजार 514 इतकी आहे. गेल्या 24 तासात 13 हजार 012 रुग्ण बरे झाले झाले आहेत. देशात एकूण मृतांची संख्या 14 हजार 894 वर पोहोचली आहे.

महाराष्ट्रात काल दिवसभरात 3 हजार 890 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या एक लाख 39 हजारांच्या पार गेली आहे. दिलासादायक बाब म्हणजे काल 4 हजार 161 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 69 हजार 631 आहे. राज्यात काल 208 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.