Maharashtra : राज्य उत्पादन शुल्क विभाग भरतीसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ

एमपीसी न्यूज – राज्य उत्पादन शुल्क विभागातील विविध ( Maharashtra ) पदांच्या तब्बल 717 रिक्त जागांच्या मेगाभरतीसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आता सोमवार (दि. 4 डिसेंबर) रोजी रात्री 11:55 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना मुदतवाढ करण्याबाबत आदेश दिले. 

Talegaon Dabhade : क्रीडापटू सेजल मोईकरचा रामदास काकडे यांच्या हस्ते सत्कार

उत्पादन शुल्क विभागातील लघुलेखक (निम्न श्रेणी), लघुटंकलेखक, जवान, जवान नि वाहनचालक आणि चपराशी या पदांच्या एकूण 717 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या भरती प्रक्रियेस मंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रयत्नांमुळे राज्य शासनाची मंजुरी मिळाली होती. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 17 नोव्हेंबर 2023 पासून सुरू झाली होती. यात 1 डिसेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.

मात्र, हे अर्ज करताना अनेक विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींमुळे अर्ज करता आले नाहीत. तसेच राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपिटीने विद्युत पुरवठा खंडीत झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना काही दिवस इंटरनेट सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करता आले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या या मागणीचा मंत्री शंभूराज देसाई यांनी संवेदनशीलतेने विचार करून विभागास तात्काळ मुदतवाढ देण्याचे आदेश दिले. याबाबत विभागाचे अपर मुख्य सचिव आणि आयुक्त यांना त्यांनी निर्देश दिल्यानंतर विभागाकडून 4 डिसेंबर 2023 च्या रात्री 11:55 वाजेपर्यंत अर्ज सादर करण्यास मुदतवाढ केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

तसेच ज्या उमेदवारांनी 30 मे, 2023 रोजीच्या जाहिरातीस अनुसरून 30 मे, 2023 ते 9 जून, 2023 या कालावधीत अर्ज भरून परीक्षा शुल्क अदा केले आहे, त्यांनाच त्यांच्या अर्जात 6 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 पासून ते 8 डिसेंबर 2023 च्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीत बदल करता येणार आहेत.

याबाबत मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, विविध कारणांमुळे विद्यार्थ्यांना अर्ज सादर करताना अडचणी आल्या. मात्र, एकही इच्छुक विद्यार्थी भरती प्रक्रियेपासून वंचित राहू नये, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच आता 4 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. अर्ज प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण येऊ नये, यादृष्टीने संबंधितांना सूचना दिल्या आहेत.

तसेच ही भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यास आम्ही कटिबद्ध असून आता मुदतवाढीचा लाभ घेऊन सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहनही मंत्री शंभूराज देसाई यांनी यानिमित्ताने केले ( Maharashtra ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.